मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागतो आहे. मुंबईला सात धरणांमधून पाणीसाठा होतो. मात्र, या सात धरणांमधील पाणीसाठा आता 32.32 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे केवळ दोन महिनेच पुरेल इतकाच पाणीसाठी धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई चांगला पाऊस झाला नाही तर, मुंबईकरांना मोठ्या पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. (Only 32 Percent Water Storage In Mumbai Dams)
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३२.३२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांक असून केवळ दीड ते दोन महिनेच हे पाणी पुरणार आहे. मुंबईला दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र सद्यस्थितीत उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून 4 लाख 67 हजार 766 दशलक्ष लिटर (32.32 टक्के) पाणीसाठा आहे.
मुंबई महापालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी तीन दिवस पुरतं. म्हणजेच महिन्याला सुमारे 12 ते 13 टक्के पाण्याचा वापर होतो. गेतवर्षी 25 मार्चला 38 टक्के तर 2022मध्ये 41 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, पाणीसाठा 50 टक्क्यांवर आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे पालिका प्रशासनाने भातसा धरणातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर तर वैतरणा धरणातून 92.5 दशलक्ष लिटर राखीव साठयाची मागणी केली होती. या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे प्रस्तावित 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली.
धरणांतील पाणीसाठा
वर्ष पाणीसाठा (दशलक्ष लिटर) टक्केवारी
25 मार्च 24 4,67,766 32.32 टक्के
25 मार्च 23 5,63,181 38.91 टक्के
25 मार्च 22 6,06,741 41.92 टक्के
हेही वाचा – Mumbai : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहिम समुद्रात 5 मुलं बुडाली; शोध सुरू