घरमहाराष्ट्रPolitics: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता...; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Politics: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता…; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Subscribe

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्षात तसंच आघाडींमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काही जागांवर अद्याप चर्चा सुरू आहेत. अशातच राजकीय पक्षांमध्ये एकेका जागेवरून जे मतभेद आहेत, त्यावर बोट ठेवत अभिनेते किरण माने यांनी टीकास्त्र डागलं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी कौतुकोद्गगार काढले आहेत. (Politics The helplessness desperation of those who went with power Kiran Mane s post went viral)

किरण माने म्हणाले की, उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:ची ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला.

- Advertisement -

समजा एखादा अभिनेता महान आहे. जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहिलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्‍या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.

उद्धव यांनी ठरवलं असतं तर, बाळासाहेबांचं नांव ‘कॅश’ करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. “माझ्या उद्धवला सांभाळा” ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धव यांनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं, असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

माने म्हणतात की, आपण नेहमी म्हणतो बघा. ‘आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.’

….तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव ‘वापरून’ त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.

बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धव ठाकरे करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.

आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या बरोबरीने उद्धव ठाकरेंच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धव ठाकरेंच्या शब्दाला वजन असते.

आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धव ठाकरेंनी केलं ते योग्यच केलं. ‘जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची’, हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धव ठाकरेंमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.

कुणी कितीही आपटा… तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाम ही काफी है ! विषय कट.. अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.

(हेही वाचा: Water storage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! केवळ दोन महिने पुरेल इतकाच धरणांत साठा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -