भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनी इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये दोन भारतीय खेळाडूंत झालेल्या रंगतदार सामन्यात साई प्रणितने समीर वर्मावर १८-२१, २१-१६, २१-१५ अशी मात केली. रिया मुखर्जी, शुभांकर डे यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला एकेरीच्या दुसर्या सामन्यात पी. व्ही. सिंधूने हाँगकाँगच्या डेंग जॉय शुआनचा २१-११, २१-१३ असा पराभव केला. या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केल्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यांतराला सिंधूकडे ११-१० अशी अवघ्या १ गुणाची आघाडी होती. यानंतर मात्र तिच्या आक्रमणाचे डेंगकडे काहीच उत्तर नव्हते. त्यामुळे सिंधूने हा गेम २१-११ अशा मोठ्या फरकाने जिंकला. दुसर्या गेममध्ये मात्र सुरुवातीपासूनच चांगला खेळ करता सिंधूने हा गेम आणि सामना जिंकला.
पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत किदाम्बी श्रीकांतने चीनच्या लु ग्वान्गझूला २१-१२, २१-१६ असे पराभूत केले. त्याचा तिसर्या फेरीत साई प्रणितशी सामना होईल. तसेच पारुपल्ली कश्यप थायलंडच्या तनॉन्गसकचा २१-११, २१-१३ असा पराभव केला. भारताच्याच एच. एस. प्रणॉयने डेन्मार्कच्या जॅन जॉर्गेनसनवर २१-१९, २०-२२, २१-१७ अशी मात केली. त्याचा पुढील फेरीत व्हिक्टर अॅक्सेलसनशी सामना होईल.