विद्यार्थ्यांचं आपल्या शिक्षकांवर जीवापाड प्रेम असणं हे अगदी साहजिक आहे. काही शिक्षक त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, शिकवण्याच्या पद्धतीमुळे बरेचदा मुलांचे लाडके बनतात आणि मुलं त्यांच्यावर मनापासून प्रेम करायला लागतात. गुरु-शिष्याच्या अशाच प्रेमाची प्रचिती नुकतीच तामिळनाडूमध्ये आली. जाणून घेऊया हे सविस्तर प्रकरण.
‘सर आम्हाला सोडून जाऊ नका’
तामिळानाडूच्या सरकारी शाळेत शिकवणाऱ्या एका सरांची बदली दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. मात्र, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे हे सर खूपच लाडके होते. त्यामुळे आपले सर शाळा सोडून जात असल्याचे समजताच, विद्यार्थींनी एकत्र येऊन त्यांच्याभोवती गराडा घातला आणि रडू लागले. सरांनी शाळेबाहेर जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती मानवी कुंपणच उभं केलं.
सरांचे डोळेही पाणावले…
दरम्यान विद्यार्थ्यांचं आपल्यावर असलेलं प्रेम बघून सरांनासुद्धा आपल्या भावना आवरणं कठीण झालं. ‘सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका’ अशी आर्त हाक विद्यार्थी वारंवार मारत असल्यामुळे सरांना रडू कोसळलं. ‘जी. भगवान’ असं या सरांचं नाव असून चेन्नईच्या तिरुवल्लरमधील शाळेत ते इंग्रजीचे शिक्षक होते. भगवान सर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवयाचे. दरम्यानच्या काळात त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच आपलेपणा निर्माण झाला होती. त्यामुळेच आपल्या आवडत्या सरांची बदली होणार कळताच मुलांनी अशाप्रकारचे पाऊव उचलले.
अखेर शाळेनेही घेतली दखल
भगवान सरांच्या बदलीबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या निषेध आंदोलापुढे शाळा प्रशासनालाही माघार घ्यावी लागली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत शाळेने भगवान सरांची बदली १० दिवस थांबवली आहे. दरम्यान सरांची बदली थांबवण्यासाठी पालक आणि शिक्षक संघटनेने देखील स्थानिक आमदारांकडे मदत मागितली आहे. आता भगवान सर त्याच शाळेमध्ये राहणार की त्यांची बदली होणार, हे येणारी वेळच सांगेल.