उत्तर प्रदेशमध्ये धुळीच्या वादळामुळे १० जणंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या आपत्तीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेत वादळाचा फटका बसलेल्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
धुळीचे वादळ
उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी सायंकाळी उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात धुळीचे वादळ आले होते. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हे वादळ आल्याची माहिती समोर आली आहे. या धुळीच्या वादळाच खूप मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असून सध्या सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वादळामुळे मैनपूरीत सहा, इटाह तीन, कासगंज ३, मोरादाबाद, बदायूँ, पीलिभीती, मथुरा, कनौज, संभल, गाझियाबाद या जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मैनपुरी जिल्ह्यात सर्वात जास्त ४१ जण जखमी झाले असून इतर जिल्ह्यांमध्ये सात जण जखमी झाले आहे. उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने एक पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.