हरयाणा राज्यातील पानिपत येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. तीन मुले रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सेल्फी घेण्यासाठी चार मुले ट्रॅकवर उभी होती, तेवढ्यात समोरून ट्रेन येत असल्याचे दिसताच त्यांनी बाजूला उडी मारली. यापैकी चौथ्या मुलाने वेळीच उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चार मुले रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेण्यात दंग होते, तेवढ्यात त्यांना समोरून ट्रेन येत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या ट्रॅकवर उडी मारली मात्र तिथूनही ट्रेन येत असल्याचे त्यांना कळले नाही. ज्या मुलाचे प्राण वाचलेत त्याने नेमक्या विरुद्ध बाजूला उडी घेतली होती.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले चारही मुले पंजाबहून लग्नासाठी पानिपतला आले होते. मृत्यू झालेल्या पैकी दोघे १९ वर्षांचे तर एक जण १८ वर्षांचा होता. हल्ली तरुणांमध्ये सेल्फी घेण्याचे वेड टोकाला पोहोचले आहे. सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची तयारी या तरुणांची असते. सेल्फीमुळे प्राण गमावल्याच्या अनेक घटना वरचेवर घडताना दिसत आहेत.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने मागच्या वर्षी एक संशोधन केले होते. त्यानुसार २०११ ते २०१७ काळात जगभरात तब्बल २५९ लोकांचा सेल्फी घेताना जीव गेलेला आहे. सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये भारता सर्वात प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर रशिया, अमेरिका आणि पाकिस्तानचा नंबर लागतो.
वर्ष २०१७ मध्ये दक्षिण कर्नाटकात तीन विद्यार्थी अशाचप्रकारे रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेताना मृत्यूमुखी पडले होते. तर महाराष्ट्रात होडीत बसून सेल्फी आणि व्हिडिओ काढताना होडी बुडाल्याच्या दोन-तीन घटना घडलेल्या आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवर एक ट्विट करत रेल्वे ट्रॅकवर फोटो काढू नका, असे आवाहन केले होते.