बॉलिवूड अभिनेते रजनिकांत आणि कमल हसन नंतर आता अभिनेते प्रकाश राज देखील निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. ते कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार नसून अपक्ष म्हणून लढवणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. प्रकाश राज यांनी बऱ्याच वेळा मोदी सरकारच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले प्रकाश राज?
प्रकाश राज यांनी त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आपण येत्या वर्षात लोकसभा निवडणूकीला उभे राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘अबकी बार जनता की सरकार’, असे देखील ते म्हणाले आहेत. यासाठी लोकांच्या पाठिंब्याची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत. प्रकाश राज आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ही वेळ आता जनतेसाठी काहीतरी करुन दाखवण्याची आहे. यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे आता जनतेच्या सरकार येण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अबकी बार जनता की सरकार असे प्रकाश राज म्हणाले आहेत.
HAPPY NEW YEAR TO EVERYONE..a new beginning .. more responsibility.. with UR support I will be contesting in the coming parliament elections as an INDEPENDENT CANDIDATE. Details of the constituency soon. Ab ki baar Janatha ki SARKAR #citizensvoice #justasking in parliament too..
— Prakash Raj (@prakashraaj) December 31, 2018
हेही वाचा – धमक्यांना घाबरत नाही – प्रकाश राज
गेल्या वर्षभरापासून ते मोदी सरकारवर टीका करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट केले होते की, “ते म्हणतात की, मी हिंदू विरोधात आहे, परंतु मी हिंदू विरोधात नसून मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात आहे. इतकेच नाही तर माझ्या मते मोदी आणि अमित शहा हे हिंदूच नाहीत”. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक लोकांनी त्यांना ट्रोल केले होते. त्यांच्यावर टीका केली होती. तर काही चाहत्यांनी त्यांचे समर्थन केले होते.