कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. आज सकाळी अॅड. प्रकाश आंबेडकरांनी विजयस्तभांला अभिवादन केले. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास येथे येऊन अभिवादन केले. सरकारकडून आलेलं वक्तव्य चुकीचे आहे. गावकऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं जे गेल्या वेळी घडलं, ते पुन्हा घडणार नाही. गावकऱ्यांचा मान सरकारने राखला पाहिजे होता, तो राखलेला नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा – विजयस्तंभाला अभिवादनासाठी लाखो अनुयायांची गर्दी
सरकारचा दुटप्पीपणा
मागच्यावेळी जे घडलं ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवलं. ज्यांना मागच्या वेळी येऊन घडवलं त्यांना नोटीसा दिल्या नाहीत. असा आरोप भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटीसा दिल्या गेल्या. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मुख्य आरोपी संभाजी भिडेच, त्यांना नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार परिषदेच्या माध्यमातून झाला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली गेली, असेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव – भीमामध्ये पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. विजय स्तंभावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराला १ वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभुमीवर येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विजयस्तभांला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातुन अनुयायांनी येथे गर्दी केली आहे. कोरेगाव भीमा येथे येणारी वाहतूक १० किमी अंतरावरूनच वळवण्यात आली आहे.