नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींची सुटका सरकारने केली होती. त्यामुळे देशात मोठे राजकीय वाद पेटला होते. मात्र, आता एका भाजपच्या प्रवक्त्याने याबाबत लिहिलेल्या लेखावरून वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने याबाबत भाजपला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप आणि विश्व हिंदू परिषदेतील वाद समोर आला आहे.
भाजपच्या नेत्य आणि प्रवक्त्या शाजिया इल्मी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार भाजपने नाही तर विश्व हिंदू परिषदेने केल्याचे म्हटले होते. याशिवाय यात मोदी किंवा शहांचा हात नसून हे सर्व विहिंपच्या लोकांनीच घडवल्याचा आरोप इल्मी यांनी लेखात केला होता. त्यानंतर विहिपने इल्मी यांच्या लिखाणावर आक्षेप घेत भाजपला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली आहे.
प्रवेश कुमार चौधरी यांची टीका –
शाजिया इल्मी यांनी बलात्काराच्या आरोपींचा सत्कार विहिंपने केल्याचा आरोप केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवेश कुमार चौधरी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. इल्मींनी लेखातून विहिंपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून त्या दिल्लीतल्या उच्च वर्गातील अशा गटाचे प्रतिनिधीत्व करतात, जो गट चुकीची माहिती पसरवत असतो, ज्यांना संघाची विचारधार काय आहे, विहिंपने हिंदू संस्कृतीसाठी केलेले काम काय आहे, हे माहिती नसल्यानेच त्यांनी हे आरोप केल्याचे चौधरींनी म्हटले आहे. याशिवाय बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार करणारे आमचे कार्यकर्ते नव्हते. जिथे सत्कार झाला, तिथे आमचे कार्यलयही नसल्याचा दावा चौधरींनी केला.
इल्मी यांनी मागीतली माफी –
विहिंपनं इल्मींच्या लिखाणावर घेतलेल्या आक्षेपानंतर, जर गुन्हेगारांचा सत्कार करणारे लोक विश्व हिंदू परिषदेचे नसतील तर मी माफी मागते, असं म्हणत इल्मींनी या प्रकरणात माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.