‘स्वच्छ सर्वेक्षण -२०१९’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. येथील विज्ञान भवनात एका शानदार समारंभात ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०१९’ चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम १० पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा उपस्थित होते.
कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार
स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण १९ पुरस्कार देण्यात आले यापैकी १३ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये कराड, लोणावळा, मूल, उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई, खोपोली, विटा, देवळाली-प्रवरा, इंदापूर, पोंभूर्णा, मौदा सीटी या शहरांचा समावेश आहे. एक लाख लोखसंख्या असलेल्या शहरामधून सातारा जिल्हयातील कराड, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई व खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे. २५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या वीटा, देवळाली-प्रवरा व इंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर २५ हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णा, मौदा, मलकापूर या शहरांनाही पश्चिम विभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Congratulations Maharashtra !
Our State is among top 3 performing States in India and this is the 2nd consecutive year of grabbing National Awards at #SwachhSurvekshan2019 ! pic.twitter.com/YKF5b8ETQ4— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 6, 2019
स्वच्छ रॅकिंगमध्ये पहिल्या शंभरात राज्यातील २४ शहरे
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील ४२३ शहरांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या १०० शहरांत महाराष्ट्रातील २४ शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड(५२), उदगीर (५३), सेालापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५८), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोबिंवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९),बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश आहे.