नवी दिल्ली : जवळपास 17 वर्षांत भारतातील वार्षिक प्रती व्यक्ती मासळीचा वापर वाढला आहे. हा वापर 2005मध्ये 4.9 किलोग्रॅमवरून 2021मध्ये 8.89 किलोग्रॅम इतक्यावर गेला आहे. एका पाहाणीतून ही आकडेवारी समोर आली असून, चांगले उत्पन्न आणि वाढत्या समृद्धीमुळे आहारात बदल झाल्याचे हे संकेत आहेत.
मासे खाणाऱ्यांमध्ये प्रती माणशी 7.43 किलोवरून 12.33 किलोपर्यंत वाढ झाली असून, 4.9 किलोंची (66 टक्के) वाढ झाली आहे. वर्ल्ड फिश इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने (IFPRI) इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) आणि इतर सरकारी संस्थांच्या सहकार्याने याबाबतची पाहाणी केली आहे.
आयएफपीआरआयने 2005-2006 ते वर्ष 2019-2021 या कालावधीत ही पाहाणी केली. 2005-2021 या कालावधीत, देशाचे मत्स्य उत्पादन 5.63 टक्क्यांच्या वार्षिक चक्रवाढीसह (CAGR) दुप्पट होऊन 14.2 दशलक्ष टन झाले. एकूण मत्स्योत्पादनापैकी 2005-06मध्ये 82.36 टक्के, 2015-16 मध्ये 86.2 टक्के आणि 2019-20 मध्ये 83.65 टक्के मासळीचा देशांतर्गत वापर झाला.
हेही वाचा – Pune : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर
उर्वरित मत्स्योत्पादनाचा वापर बा अखाद्य कारणांसाठी आणि निर्यातीसाठी करण्यात आला. भारतात मासळीची देशांतर्गत मागणी वाढत आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्यग्राहक बनला आहे, असे आयसीएआरचे महासंचालक हिमांशू पाठक यांनी अहवालात म्हटले आहे. तथापि, भारतातील प्रती माणशी मासळीचा वापर जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. अहवालानुसार, विविध भारतीय राज्यांपैकी त्रिपुरामध्ये सर्वाधिक (99.35 टक्के) मत्स्यग्राहक आहेत, तर हरियाणामध्ये सर्वात कमी (20.55 टक्के) मत्स्यग्राहक आहेत.
देशात वापरासाठी आयात केल्या जाणाऱ्या मासे आणि मत्स्यउत्पादनांचे प्रमाणही वेगाने वाढले असून ही वाढ 543 टक्क्यांची आहे. यात वार्षिक 12.84 टक्क्यांच्या वाढीसह 2005-06मध्ये सुमारे 14,000 टनांवरून 2019-20मध्ये 76,000 टनांपर्यंत वाढले. स्थानिक बाजारपेठेतील मासळीचा वापर, स्थानिक पातळीवर मिळणारे तसेच आयात केलेले माशांचा विचार करता, देशांतर्गत माशांचा वापर 54.28 लाख टनावरून 120 टक्क्यांची वाढ नोंदवत 1 कोटी 19.24 लाख टन झाले.
हेही वाचा – Congress Vs BJP : सचिन सावंत यांनी आशिष शेलारांना सांगितले – Get well soon! कारण…