जर तुम्हाला दिल्ली, वाराणसी आणि बंगळुरु विमानतळावरून विमान प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या विमानतळावरून बोर्डिंग पासशिवायही प्रवास करता येणार आहे. तुमचा चेहराचं तुमचा बोर्डिंग पास म्हणून काम करेल. यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवे ‘डिजियात्रा’ ॲप लाँच केले आहे.
डिजीयात्रा ॲपसह आता विमानतळांवरील चेक-इन सुद्धा पेपरलेस असेल. चेहरा ओळखणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रवाशांना या विमानतळांवरून प्रवास करता येणार आहे. दिल्लीसह बेंगळुरु आणि वाराणसी विमानतळांवर गुरुवारी डिजीयात्रा ॲप सुरु होत आहे.
Live: Inauguration of #DigiYatra by HMCA Sh @JM_Scindia. https://t.co/gqSNCpVuvd
— MoCA_GoI (@MoCA_GoI) December 1, 2022
डिजीयात्रा ॲपचा फायदा काय?
कोणत्याही विमान कंपनीच्या विमानातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वप्रथम डिजीयात्रा ॲप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर प्रवाशांना थेट विमानतळावर एन्ट्री मिळणार आहे. यावेळी त्यांना गेटवर कोणत्याही सुरक्षा तपासणीतून जावे लागणार नाही. याचा अर्थ प्रवाशांना फक्त एका ॲपद्वारे बोर्डिंग गेटपर्यंत जाता येईल, यामुळे प्रवाशांच्या वेळीचही बचत होईल आणि त्यांचा प्रवासही सुरक्षित आणि आनंदायी होईल.
हे ॲप पहिल्या टप्प्यात सात विमानतळांवर लाँच केले जाईल. पण सुरुवातीला दिल्ली, बंगळुरु आणि वाराणसी या तीन विमानतळांसाठी सुरु केले जात आहे. मारच 2023 पर्यंत ते हैदराबाद, कोलकत्ता, पुणे, विजयवाडा या विमानतळांवर सुरु होईल. यानंतर हे ॲप संपूर्ण देशात सुरु केले जाईल. मात्र हे सेवा सध्या देशांतर्गत विमान प्रवाशांसाठीच सुरु केली जात आहे.
हे ॲप कसे करेल काम?
डिजीयात्रा अॅप डाऊनलोड करून त्यावर प्रवाशांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यानंतर प्रवाशांसाठी एक कोडेड बोर्डिंग पास जनरेट होईल, तो स्कॅन करावा लागेल. आता ई- गेटवरील फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे प्रवाशाची ओळख पटवली जाईल आणि कागदपत्रांची पडताळणी होईल. यानंतर प्रवासी थेट विमानतळावर प्रवेश करु शकतात. विमानतळावर प्रवेश केल्यानंतर प्रवाशांना सिक्युरिटी चेक आणि इतर सामान्य प्रक्रियांमधून जावे लागेल.
या अॅपद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती (PII) कुठेही स्टोर केली जाणार नाही. पॅसेंजर आयडी आणि प्रवासाची ओळखपत्रे प्रवाशाच्या स्मार्टफोनवरच सुरक्षित वॉलेटमध्ये साठवली जातात.