कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आणि ही लसीकरण मोहीम आणखी वेगवान करण्यासाठी केंद्र सरकार आता देशातील घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहे. हर घर दस्तक या अभियानातंर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लसीकरण मोहिमेला आणखी वेग यावा आणि लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांचे लसीकरण व्हावे म्हणून कोरोना विरोधी मेगा लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. हर घर दस्तक या अभियानातंर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीची दुसरी मात्रा देतील. त्याचप्रमाणे ज्यांनी आत्तापर्यंत लस घेतलीच नाही किंवा ज्यांना लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे अशा नागरिकांचे घरपोच लसीकरण केले जाणार आहे.
देशाने नुकताच १०० कोटी लसीकरणाचा टप्प पार केला. मात्र यात १८ वर्षांवरील ७७ नागरिकांनी केवळ लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे १० करोडहून अधिक नागरिकांचा पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्यासाठी आवश्यक असलेला वेळ निघून गेला आहे मात्र तरीही त्यांनी लसीकरण केलेले नाही. केंद्र सरकारसाठी हा चिंतेचा विषय आहे.
जिथे एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे अशा देशातील एकूण ४८ जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मनसुख मंडाविया यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना दिल्या आहेत. सरकारी आकड्यांनुसार देशातील २.९२ करोड लाभार्थी आहेत ज्यांचा लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ ६ आठवड्यांहून अधिक लांबणीवर गेली आहे.
त्याचप्रमाणे १.५७ करोड लोकांनी ४-६ आठवडे आणि १.५० करोड लोकांनी २-४ आठवडे होऊन गेले आहेत मात्र त्यांनी अद्याप लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. यात कोव्हिशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.