जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस आल्यानंतर देखील काही समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागू शकते, असे संकेत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी फ्लू आणि इन्फ्लूएन्झा विषाणूचे उदाहरण दिलं. फ्लू आणि इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी दरवर्षी लस घ्यावी लागते.
शरीरात प्रतिपिंडांच्या (अँटिबॉडीज) कालावधी संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भार्गव म्हणाले की, सध्या या संदर्भात स्पष्टपणे काहीही सांगितलं जाऊ शकत नाही. हा विषाणू नवीन असून तो केवळ सहा-सात महिन्यांपासून आला आहे, म्हणून या संदर्भात कोणतंही वैज्ञानिक तथ्य समोर आलेलं नाही. वेगवेगळ्या वैज्ञानिक अभ्यासामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत.
एकदा संसर्ग झाल्यावर प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) शरीरात सहा महिने ते वर्षभर राहतात असं म्हणतात. परंतु परिस्थिती पूर्णपणे निवळण्यास वेळ लागेल. डॉ. भार्गव यांच्या मते, श्वसन प्रणालीवर हल्ला करणाऱ्या दोन विषाणूंविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी एक फ्लू आणि दुसरा इन्फ्लूएंझा आहे. हे दोन्ही विषाणू वेगाने बदलतात. या कारणास्तव, त्याचे प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) दीर्घकालीन संरक्षणासाठी प्रभावी नाही. वृद्ध लोक, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांना दरवर्षी लस घ्यावी लागते. कोरोना विषाणू देखील श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. जर कोरोना विषाणू देखील फ्लू किंवा इन्फ्लूएन्झासारखा वागला तर हे टाळण्यासाठी दरवर्षी लस घ्याव्यी लागेल.
हेही वाचा – अभिनयाच्या क्षेत्रात ‘रन-आउट’ होण्यापूर्वी मुंबईतच नशीब काढायला आला होता ना?