पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या पुर्वपत्नीने इम्रान खानवर जळजळीत टीका केली आहे. “पुलवामा हल्ल्यानंतर अधिकृत प्रतिक्रिया देण्यासाठी इम्रान खान लष्कराकडून सूचना येण्याची वाट पाहत होता. ते देशातील लष्काराच्या हातातले बाहुले आहेत”, अशी टीका इम्रान खानची पत्नी रेहम खानने मंगळवारी केली. पुलवामा हल्ल्याच्या तीन दिवसानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने आपली प्रतिक्रिया दिली होती. जर भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध छेडले तर पाकिस्तान देखील जशास तसे उत्तर देईल, असे खान म्हणाला होता. त्यानंतर रेहम खानने हा आरोप केला आहे.
“इम्रान खान यांनी सत्ता मिळवण्यासाठी विचारधारा आणि तटस्थ धोरणांना तिलांजली दिली. आपण काय करावे आणि देशाला काय हवे? याबाबत इम्रान खान यांना लष्कराकडून सूचना मिळत असतात. निवडणुकीच्या काळात नवीन अतिरेकी धार्मिक राजकीय पक्ष पुढे आलेले आपण पाहीले. त्यानंतर इस्लामाबादमध्ये बराच हिंसाचार देखील पाहायला मिळाला. इम्रान खानला जे शिकवले आहे, तेच तो बोलतो. जर तो म्हणतोय की आम्ही युद्धाला प्रतिक्रिया देऊ, याचा अर्थ त्याला काहीतरी संकेत द्यायचे आहेत.”, असेही रेहम खान म्हणाली आहे. पाकिस्तानच्या भल्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करावे लागणार आहे. इम्रान खान बरोबर बोलत असले तरी त्यांनी मागच्या सहा महिन्यात एकही पाऊल उचललेले दिसले नाही.
काय म्हणाला होता इम्रान खान
“जर भारताने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तरी आम्ही गप्प बसू, असा जर भारत विचार करत असेल तर ते चूक आहे. आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ. प्रतिकार करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नसेल. आपण सगळे जाणतो की युद्ध सुरु करणे, हे मानवाच्या हातात आहे. मात्र ते कुठपर्यंत जाईल, हे देवालाच माहीत.”, अशी प्रतिक्रिया इम्रान खानने पुलवामा हल्ल्यानंतर दिली होती.