घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींकडून वाघांची आकडेवारी जाहीर, आशियाई सिंहांचे भारत एकमेव घर

पंतप्रधान मोदींकडून वाघांची आकडेवारी जाहीर, आशियाई सिंहांचे भारत एकमेव घर

Subscribe

नवी दिल्ली : प्रोजेक्ट टायगरला (Project Tiger) 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच करताना स्मरणार्थी नाणेही जारी केले आहे. यावेळी त्यांनी वाघांची नवीन आकडेवारी (New statistics of tigers) जाहीर केली आहे. या नवीन आकडेवारीनुसार 2022 मध्ये देशात वाघांच्या संख्येत 200 ने वाढ झाली आहे. यापूर्वी वाघांची संख्या 2967 इतकी होती, मात्र आता वाघांची संख्या 3167 वर पोहोचली आहे.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, 1973 मध्ये 9 व्याघ्र राखीव क्षेत्रापासून देशात वाघांच्या संवर्धनाची सुरुवात झाली. आज 53 व्याघ्र प्रकल्पांपर्यंत ही संख्या पोहोचली आहे आणि यापैकी 23 व्याघ्र प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केले होते. 1 एप्रिल रोजी या प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) अंतर्गत वाघ, सिंह, बिबट्या, हिम तेंदुए, जग्वार, चित्ता, प्यूमा यांच्या संवर्धनावर आपण भर देणार आहोत.

- Advertisement -

निसर्गाचे रक्षण करणे भारतीय संस्कृतीचा भाग
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून देशातील वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात भारताने आघाडीची भूमिका बजावली आहे. निसर्गाचे रक्षण करणे हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे प्रोजेक्ट टायगरचे यश केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्याचवेळी जगातील 75 टक्के वाघ भारतात राहतात, असे मोदी यांनी सांगितले.

आशियाई सिंहांचे भारत एकमेव घर
मोदी म्हणाले की, ‘जगात भारत हे एकमेव आशियाई सिंहांचे घर असून देशात सिंहांची संख्याही वाढत आहे. 2015 मध्ये देशात 525 सिंह होते आणि 2020 मध्ये ही संख्या 675 पर्यंत पोहचली आहे. गेल्या चार वर्षांत बिबट्यांच्या संख्येतही 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्ही एका महत्त्वाच्या काळाचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी सांगितले की, भारताने केवळ वाघांना वाचवले नाही तर त्यांना एक अशी इकोसिस्टम दिली ज्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होईल. जगभरातील एकूण जमिनीपैकी आपल्याकडे फक्त 2.4 टक्के जमीन असली तरीही जागतिक विविधतेत आपला वाटा 8 टक्के आहे.
मोदी म्हणाले की, ‘भारतातून अनेक दशकांपूर्वी चित्ता नामशेष झाला होता, पण आम्ही दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून चित्ते भारतात आणले. एका देशातून दुसऱ्या देशात चित्ता आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. याशिवाय जगातील सर्वाधिक आशियाई हत्ती भारतात असून ही संख्या सुमारे 30 हजारांपर्यंत आहे, असे मोदींनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -