भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. भारताची तिन्ही सैन्य दले रशियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या निमित्ताने राजनाथ सिंह तात्काळ सुट्टया भागांचा पुरवठा करण्याची मागणी रशियाकडे करणार आहेत. कारण सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील फायटर विमाने आणि रणगाड्यांसाठी सुट्ट्या भागांची आवश्यकता आहे.
भारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री आहेच. पण रशियाने सुरुवातीपासूनच संरक्षण क्षेत्रात भारताला मोठे सहकार्य केले आहे. भारताच्या ताफ्यातील बहुतांश शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्यामुळे यांच्या सुट्टया भागांसाठी भारताला रशियाची गरज लागते. एस-४०० सिस्टिमही लवकरात लवकर मिळवण्याचे भारताचे प्रयत्न आहेत.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणाव मोठया प्रमाणात वाढला आहे. दोन्ही देशांनी सीमारेषेवर आपले सैनीक तैनात केले आहेत. त्यामुळे हवाई मार्गाने लवकरात लवकर हे सुट्टे भाग आणि उपकरणे पोहोचवण्याची विनंती रशियाला करण्यात येणार आहेत.
चीनला प्रत्युत्तर देण्यास तयार
सीमा रेषावर चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सैन्य तैनातीबरोबर आणि युद्धासाठीही सज्ज आहे. सुखोई-३० एमकेआय आणि टी-९० रणगाडयासाठी सुट्टया भागांची आवश्यकता आहे. उद्या गेमचेंजर ठरु शकतील अशी ही भारताची दोन महत्वाची शस्त्रे आहेत. समुद्र मार्गाने हे सुट्टे भाग पोहोचवले जातात. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ विमानाने हे भाग पोहोचवण्याची भारताची मागणी आहे.
हे ही वाचा – भारत – चीनी सैनिकांमधील संघर्षाचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर!