काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केले जात असल्याचे आरोप मोदी सरकारवर केले होते. मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत मोदी सरकारने आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाला चौकशीचे आदेश दिले. आयटी मंत्रालयाने या प्रकरणाची प्राथमिक तपासणी करत प्रियांका गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलेय. तसेच प्रियांका गांधीने इन्स्टाग्राम अकाउंट हॅकिंगवरून केले सर्व आरोप फेटाळून लावले.
प्रियांका गांधींचे आरोप नेमके काय?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यात. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुरू झालेत. सर्वच पक्ष एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी अखिलेश यादव यांनी उपस्थित केलेल्या फोन टॅपिंग मुद्द्यावरून भाजपा सरकारवर आरोप केले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, अखिलेश यादव तर फोन टॅपिंगवर बोलतायत पण हे लोक माझ्या मुलांचा इन्स्टाग्राम आयडीही हॅक करत आहेत, भाजपा सरकार विरोधी पक्षांवर दबाव तंत्राचा वापरतेय. आता त्यांच्याकडे काय काम नाही तर माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम हॅक करत आहेत. प्रियांका गांधी यांच्या आरोपांची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गंभीर दखल घेत याप्रकरणी सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्राथमिक तपासानंतर प्रियांका गांधींचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच
बुधवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले की, प्राथमिक तपासाअंती असे दिसून आले की काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांच्या मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी कोणतीही छेडछाड झालेली नाही. त्यांनी सरकारवर केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनीही पेगॅसस प्रकरणावरून मोदी सरकावर निशाणा साधला होता.
“पेगॅससचा विषय हा आंतरराष्ट्रीय विषय होता. भारताचा डेटा इतर कोणत्या तरी देशात ठेवला होता. मात्र सरकारने यावर कधीच चर्चा केली नाही. त्यामुळे लोकशाहीवर सातत्याने हल्ला होतो.” असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.