जम्मू काश्मीर राज्य पूनर्रचना विधेयक आणि कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र गेल्या २–३ दिवसांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खोऱ्यातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता जम्मूमध्ये ‘२ जी‘ इंटरनेट तर, काश्मीरमध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली आहे.
वाचा – कलम ३७० : पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडीविक्रीवर बंदी
२ जी इंटरनेट सेवा सुरू
जम्मू–काश्मीरचे मुख्य सचिव बी. आर. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन खोऱ्यातील परिस्थितीची माहिती दिली होती. जम्मू काश्मीर मधील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा–कॉलेज आणि सरकारी कार्यालये येत्या १९ ऑगस्ट, सोमवारपासून खुले करण्याचे निर्देश जारी करण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कार्यालये, सचिवालय शुक्रवारपासून कामकाजाला सुरुवात करणार आहेत. तसेच जम्मू–काश्मीरच्या उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा आणि जम्मू शहरात २ जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून अन्य सर्व निर्बंध देखील उठवण्यात आले आहेत. काश्मीरमध्ये मात्र, तूर्त केवळ फोन सेवा सुरू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय कायदा–सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. तसेच, अटकेत असलेल्या लोकांनाही त्यानंतरच सोडले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – कलम ३७० : जम्मू काश्मीरमधील शाळा-कॉलेज सोमवारपासून उघडणार