नवी दिल्लीः मुस्लीम समुदायाने जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या यावर विश्वास ठेवणे अवघड आहे, असे निरीक्षण नोंदवत दिल्ली सत्र न्यायालयाने दंगलीतील तीन मुस्लीम तरुणांची निर्दोष सुटका केली. हा निकाल देताना न्यायालयाने दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले.
अकिल अहमद, रहीश खान आणि इरशाद या तीन तरुणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रमचला यांनी निर्दोष मुक्त केले. चंदूनगर, करवाल नगर रोड येथे दंगल करण्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. मात्र या तिघांविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने या तिघांची निर्दोष सुटका केली.
कुरियरच्या ऑफिसचं दंगलीत नुकसान झाल्याची तक्रार दानिश यांनी केली होती. दुकान लुटले. आग लावण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये सहा ते सात लाखाचे नुकसान झााले, असा आरोप दानिश यांनी केला होता. दानिश यांच्या तक्रारीसोबत अन्य काही तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या. पोलिसांनी या सर्व तक्रारी एकत्र करुन तपास केला. दंगली प्रकरणी पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटक केली. दंगल झाली तेव्हा आपण घटनास्थळी नव्हतोच, आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा या तिन्ही तरुणांनी केला.
निकाल देताना न्यायालयाने पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली. तपास अधिकाऱ्याने दंगलीच्या २७ तक्रारी एकत्र केल्या. तक्रारींच्या यादीत या तीन तरुणांचा दोनदा उल्लेख करण्यात आला आहे. या २७ तक्रारींचा तपास कधी झाला हे तपास अधिकाऱ्याला सांगता आले नाही. २७ तक्रारी एकत्र करुन गुन्हा नोंदवण्यात आला. पण पुरावे केवळ दानिशच्या दुकानाचे मिळाले, असे आरोपपत्रात नमूद आहे. ही विसंगती आहे, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.
जमावाने जय श्रीरामाच्या घोषणा दिल्याचे काही तक्रारींमध्ये म्हटले आहे. तोडफोड करताना मुस्लीम समुदायाने जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण ही दंगल धार्मिक असल्याचं तक्रारादाराने म्हटले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मह्त्त्वाचे म्हणजे दोन गटात तणाव निर्माण झाला होता आणि त्यातूनच दंगल झाली असा जबाब तापस अधिकाऱ्याने नोंदवला आहे. मात्र या घटना नेमक्या कधी झाल्या याचा तपशील तपास अधिकाऱ्यांना सांगता आला नाही. त्यामुळे घटनेचा तपास अपूर्ण झाला, असा ठपका न्यायालयाने ठेवला.
कोल्हापूर दंगल प्रकरणी ३६ जणांना अटक
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही हिंदुत्ववादी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. पण अचानकपणे सकाळी 10.30-11 वाजेच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर करण्यात आला. यानंतर रस्त्यावर चपलांचा खच पडलेला पाहायला मिळाला. या घटनेबाबतची संपूर्ण माहिती देण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोल्हापुरातील राड्याप्रकरणी आत्तापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. तर यांतील तीन आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना बाल न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.