गेल्या ६५ वर्षांपासून भारताच्या राजकारणात सुरू असलेला अयोध्या प्रश्न थांबायचं नाव घेत नाहीये. दरवर्षी आणि प्रत्येक निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा समोर येतो किंवा आणला जातो आणि त्यावर सर्वच राजकीय पक्ष प्रतिक्रिया देऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करू लागतात असं चित्र आपल्याला नेहमीच दिसतं. यंदाही पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसंच काहीसं चित्र देशात तयार झालं असून भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेससह आता एमआयएम पक्षानंही या मुद्द्यावर उडी घेतली आहे. अयोध्या राम मंदिर मुद्द्यावर भाजपने एकदा अध्यादेश काढून दाखवावाच असं आव्हान एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला केलं आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – राम मंदिरासाठी विहिंपने मागवले ७० ट्रक भरून दगड
‘कुणीही उठतो, अध्यादेशाच्या बाता करतो’
सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यादरम्यान, राजकीय पटलावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच ‘राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करायला हवा’ अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. त्यावरच आता ओवैसींनी थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं आहे.
Why don't they bring it (ordinance on Ram temple)? Let them do it. Every time they are threatening that they will bring an ordinance. Every Tom, Dick & Harry of BJP, RSS, VHP says this. Do it. You are in power. I challenge you to do it. Let us see: Asaduddin Owaisi, AIMIM pic.twitter.com/XXXG4xQLtE
— ANI (@ANI) October 29, 2018
एकदा अध्यादेश काढून दाखवाच!
यावेळी केंद्र सरकारच्या बोटचेपे धोरणावर ओवैसी यांनी सडकून टीका केली. ‘प्रत्येक वेळी भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदु परिषदेमधला कुणीही टॉम, डिक अँड हॅरी उठतो आणि अध्यादेश काढायच्या बाता करतो. मग केंद्र सरकार एकदाचा अध्यादेश आणत का नाही?’ असा सवाल ओवैसी यांनी केंद्र सरकारला आणि भाजपला केला आहे. ‘तुम्ही सत्तेत आहात, मी तुम्हाला आव्हान देतो, अध्यादेश काढून दाखवा, बघुयात’, असं उघड उघड आव्हानच ओवैसी यांनी दिलं आहे.
हेही वाचा – ‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ प्रविण तोगडिया यांचा इशारा