जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. कोरोना रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच आता कोरोनाबाधितांना म्युकरमायकोसिसचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर येत आहे. भारतात कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्राने राज्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ब्लॅक फंगसला साथरोग कायद्यांतर्गत Notifiable disease म्हणून अधिसूचित कराकेंद्राने म्हटले होते. या केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत आता तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केली आहे. या तीन राज्यांनी आणि एका केद्रशासित प्रदेशाने गुरुवारी तसं जाहीर केलं. तेलंगणा आणि राजस्थान या दोन राज्यांनी ही निर्णय आधीच घेतला आहे.
देशात ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत सर्वाधिक आहे. आतापर्यंत देशात ७ हजार ५२१ ब्लॅक फंगसच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये २१९ रुग्णांचा बळी गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे १५०० रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ९० रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये १ हजार १६३ रुग्ण सापडले तर ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये ५७५ रुग्ण सापडले असून ३१ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यातही ब्लॅक फंगसचे रुग्ण जास्त असल्याची माहिती आहे.
केंद्राने राज्यांना महामारी घोषित करण्याचे आदेश
ब्लॅक फंगसला एपिडेमिक डिसिजेस अॅक्ट, १८९७ अन्वये महामारी जाहीर करावे, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. गुरूवारी केंद्र सरकारने म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश साथीच्या आजारात केला आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचे नवनवीन रुग्ण समोर येत आहेत. राजस्थान आणि तेलंगणामध्ये वाढत्या रुग्णांमुळे म्युकरमायकोसिस आजाराला याआधीच महामारी घोषित केले होते. त्यापाठोपाठ केंद्र सरकारानेही म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये केला आहे.
केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून केंद्र आरोग्य विभाग सहाय्यक सचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भातील विस्तृत माहिती जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्रालयाने या संबंधी सर्व राज्यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये, खासकरुन ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांच्यामध्ये ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचे सांगितले होते. ब्लॅक फंगसच्या रुग्णांसंबंधी सर्व माहिती रुग्णालयांनी आणि त्या-त्या राज्यांनी देणं बंधणकारक असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आले आहे.