चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ काढली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्राही थांबवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना विनंती केली. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ थांबवण्यासाठी सरकार बहाणे करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली. (national rahul gandhi hits back on mansukh mandaviya letter to stop bharat jodo yatra due to coronavirus)
भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवरून राहुल गांधींनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. ‘भारत जोडो यात्रे’साठी राहुल गांधी गुरुवारी हरियाणातील नूह येथे होते. त्यावेळी राहुल गांधींनी आरोग्य मंत्रालयाच्या पत्राचा समाचार घेतला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी भाजपने मला पत्र लिहिले आहे. यामध्ये ते कोरोना वाढतोय. तुम्ही भारत जोडो यात्रा थांबवा, मास्क घाला असे सांगत आहेत, पण आपली भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारीपर्यंत जाणारच. आता आपल्या यात्रेला १०० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे यात्रा थांबवण्यासाठी ते बहाणे करत आहेत”
#WATCH | …It’s their (BJP) new idea, they wrote a letter to me saying COVID is coming & stop the Yatra. All these are excuses to stop this Yatra, they are scared of India’s truth: Rahul Gandhi on Union Health min’s letter pertaining to Covid protocols in Bharat Jodo Yatra pic.twitter.com/BCzziH2n06
— ANI (@ANI) December 22, 2022
राहुल यांच्या आधी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. हे पत्र केवळ राजकीय कारणासाठी पाठवण्यात आल्याचे जयराम यांनी सांगितले. जयराम म्हणाले की Omicron sub-variant BF.7 ची प्रकरणे गुजरात आणि ओदिशामध्ये जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये आढळली होती. परंतु हे पत्र आता लिहिले गेले आहे. पण निवडणुकीत कोणताही कोरोना प्रोटोकॉल पाळला गेला का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने राहुल गांधींना पत्र लिहिले होते. या पत्रात राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास प्रवास पुढे ढकलण्यात यावा. प्रवासात मास्क आणि सॅनिटायझर वापर करावा. केवळ लसीकरण झालेल्यांनीच यात्रेत सहभाग घ्यावा. प्रवासात सामील होण्यापूर्वी आणि नंतर प्रवाशांना वेगळे ठेवावे, असे या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा – किशोरी पेडणेकरांना ‘गोमाता भोवली’; घर आणि कार्यालय पालिकेच्या ताब्यात- सोमय्यांचा दावा