नवी दिल्ली : अटलजी याच ठिकाणी बसले आणि संसदेचा निर्णय मी स्वीकारतोय असे म्हटले होते. त्यांच्या सरकारचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. यूपीए आणि काँग्रेससारख्या सरकारला आपण वाचवू शकलो असतो. परंतू तसे केले नाही. कारण, काँग्रेसचे चारित्र्य भ्रष्टाचाराचे आहे, आमचे चारित्र्य तसे नाही. फक्त एका मताचा फरक होता. एनडीए सरकारनेही सभापतीपदाची प्रतिष्ठा पाळली होती. आमचे सरकार गेले. जनताच सर्व काही पाहते, सर्व काही जाणते. आमचे सरकार एका मताने गेले, पण शेवटी काय झाले? प्रचंड बहुमताने अटलजी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा अटलजींच्या नेतृत्वाखाली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही तत्त्वांचे राजकारण वाचवण्यासाठी आलो आहोत असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावर विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
केंद्र सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारी पुन्हा एकदा संसदेत चर्चा झाली. बुधवारी काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात करत मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, अविश्वास प्रस्ताव ही घटनात्मक प्रक्रिया आहे, त्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. यातून राजकीय पक्ष आणि पक्षांचे चारित्र्य समोर येते.
त्या तीन प्रस्तांवाचा शहा यांनी केला उल्लेख
आपल्या उत्तराच्या भाषणात बोलताना अमित शहा म्हणाले की, मला तीन प्रस्तावांचा उल्लेख नक्कीच करायचा आहे. आम्ही दोन प्रस्ताव आणले होते, एक एनडीए सरकारच्या विरोधात आला होता. जुलै 1993 मध्ये नरसिंह रावांचे सरकार असताना अविश्वास प्रस्ताव आला. कोणत्याही मार्गाने सत्तेत राहणे हे काँग्रेसचे मूळ तत्व आहे. नरसिंह रावांचे सरकार जिंकले, पण नंतर अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले कारण हा विजय झारखंड मुक्ती मोर्चाला लाच देऊन मिळवला गेला होता असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर शरसंधान डागले.
हेही वाचा : 137 दिवसांनंतर लोकसभेत, 36 मिनिट बोलले; राहुल गांधींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
कॉंग्रेसवर साधला अमित शहांनी निशाणा
यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसने गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र गरिबी तशीच राहिली. पण मोदींना ही समस्या समजली कारण त्यांनी गरिबी पाहिली होती. पीएम मोदींनी 9 वर्षांत 11 कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालये दिली. तर मोदी हर घर जल योजनेतून 12 कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी पोहोचवले.
#WATCH | There is one member in this House who has been launched 13 times in politics. This member failed all 13 times. I have seen one launching when he went to meet a poor lady from Bundelkhand named Kalavati. But what did you do for her? House, ration, electricity were… pic.twitter.com/bvUpOA9CsS
— ANI (@ANI) August 9, 2023
हेही वाचा : Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींची तुलना रावणाशी, राहुल गांधीच्या वक्तव्यावरून सत्ताधारी संतापले
भारत जोडोवरुनही राहुल गांधीवर हल्ला
यावेळी खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाला उत्तर देताना अमित शहा यांनी म्हटले की, भारतीय राजकारणात तीन कोड होते. त्यामध्ये भ्रष्टाचार, कुटुंबवाद, तुष्टीकरण. पंतप्रधान मोदींनी ते काढून टाकले. भ्रष्टाचार भारत छोडो, भतीजावाद भारत छोडो, तुष्टीकरण भारत छोडो असे म्हणत त्यांनी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा समाचार घेतला. पुढे बोलताना राहुल गांधींवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला 13 वेळा लॉन्च करण्यात आले आणि केवळ 13 वेळा अपयश आले. ते बुंदेलखंडमधील कलावती या महिलेला भेटायला गेले तेव्हा मी त्यांचा एक लाँचही पाहिला. पण त्याने कलावतीसाठी काय केले? कलावतींना घर, वीज, गॅस आदी सुविधा देण्याचे काम नरेंद्र मोदींच्या सरकारने केले.