कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने Arogya Setu मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातून लोकांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. यातून कोरोनाग्रस्त किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करणं आणि त्यांना यासंदर्भात माहिती द्यायला सुरुवात गेली. मात्र, वेळोवेळी विरोधी पक्षांनी आरोग्य सेतू मोबाईल एपवर आक्षेप देखील घेतला होता. या एपच्या माध्यमातून लोकांची माहिती गोळा करून त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे ते कुणी तयार केलं यासह त्याची सर्व माहिती जाहीर करावी, अशी देखील मागणी केली गेली. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांनीच या एपवर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर त्यांनी राष्ट्रीय माहिती केंद्र अर्थात NIC (National Information Centre) कडे विचारणा केली. मात्र, त्यावर एनआयसीनं दिलेलं उत्तर सगळ्यांनाच चक्रावून टाकणारं आहे. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सौरव दास नावाच्या एका व्यक्तीने…
आरोग्य सेतू एपच्या संदर्भात एनआयसी, एनईजीडी (National E-Governance Division) आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे विचारणा केली होती. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा दास यांनी केला आहे. या कुणाकडेही या एपची माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर त्यांना देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माहिती आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर केंद्रीय माहिती आयुक्तांनी एनआयसीला नोटीस पाठवली आहे. ‘तुमच्याकडे Arogya Setu मोबाईल एपची काहीही माहिती नसेल, तर तुमचं नाव या मोबाईल एपवर का आहे?’ असा सवाल माहिती आयुक्तांनी केला आहे. ‘माहिती आयोगाने सीपीआयओ, एनआयसीला आदेश दिले आहेत की जर त्यांच्याकडे आरोग्य सेतू एपसंदर्भात काहीही माहिती नाही, तर https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाईट gov.in या डोमेनखाली कशी तयार करण्यात आली? याचं लेखी स्वरूपात उत्तर देण्यात यावं’, अशी माहिती माहिती आयुक्त वनाज एन सरना यांनी दिली आहे.
दरम्यान, फक्त एप कुणी तयार केलं यासंदर्भातच नाही, तर या एपच्या माध्यमातून लोकं देत असलेली माहिती, त्याचं विश्लेषण, त्याच्या तयार होणाऱ्या फाईल्स यासंदर्भात देखील कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची देखील माहिती आयुक्तांनी दखल घेतली आहे. याआधी देखील राहुल गांधींनी आरोग्य सेतू एपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी प्रत्येक वेळी हे आक्षेप खोडून काढले आहेत.