देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोना काळ संपेपर्यंत मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गरजेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे अनेक राज्यात मास्क न घातल्यास कारवाई केल्या जात आहेत. सध्याच्या दिवसात मास्क हा जीवनाचा अविभाज्य घटन झाला सारखा आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क सर्व राज्यांच्या सरकारने अनिवार्य केले आहेत. दरम्यान आता झारखंड सरकारने देखील काही कठोर पाऊल उचलले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यातील सर्व नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. मास्क न घातल्यास २ वर्ष तुरुंगावासाची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. यास झारखंड संक्रमण रोग अध्यादेशानुसार कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये आतापर्यंत ६ हजार ७६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ३ हजार ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ३ हजार ६४८ जणांवर उपचार सुरू आहेत.
Jharkhand Cabinet yesterday approved Jharkhand Contagious Disease Ordinance under which penalty up to Rs 1 lakh and jail term up to 2 years can be imposed against violators of preventive measures of COVID-19 like not wearing masks in public places & spitting in public.
— ANI (@ANI) July 23, 2020
देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ
दरम्यान देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४५ हजार ७२० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांच्या संख्येने १२ लाखांचा टप्पा पार केला आहे. तसेच २४ तासांत सर्वाधिक १ हजार १२९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा संख्या १२ लाख ३८ हजार ६३५वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २९ हजार ८६१ मृत्यू झाला आहे. तसेच ७ लाख ८२ हजार ६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख २६ हजार १६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचा – China Mars Mission: चीन मंगळावर शोधणार ‘बर्फ’, अंतराळात पाठवले ‘तियानवेन -१’