सध्या देशात वाढणारे प्रदूषण आणि लोकसंख्या वाढीमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर तोडगा काढणाऱ्या ‘क्वाड्रिसायकल’ला केंद्रातूनही मंजूरी मिळाली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. त्यामुळे पुढील काळात गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ही गाडी घ्या. कारण यामुळे प्रदूषण तर कमी होईलच शिवाय पार्किंगचाही प्रश्न सुटेल.
‘क्वाड्रिसायकल’ची वैशिष्ट्ये
देशात अनेक राज्यात ऑटोरिक्षा आहेत.या ऑटोचे अपग्रेडेड ही ‘क्वाड्रिसायकल’ आहे. फक्त ही तीन चाकांची नाही तर चारचाकी आहे. ही गाडी १ तासाला ७० किलोमीटर चालू शकते. या गाडीचे वजन ४५० किलो आहे. आणि हिचा मायलेज ३६ किलोमीटर प्रति लीटर आहे. महत्वाची गोष्ट अशी ही गाडी बजाज कंपनी बनवत असून युरोपातील प्रदूषण उत्सर्जन नियमांमध्ये ही गाडी अगदी चोख बसली आहे. ही गाडी २ ते ३ लाखांमध्ये भारतीयांना उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय बजाजला टक्कर देण्यासाठी पुढील काळात ही गाडी अन्य विदेशी कंपन्या बनवण्याची देखील शक्यता आहे.
भारतीय बनावटीची ‘क्वाड्रिसायकल’
भारतीय बनावटीची क्वाड्रिसायकल परदेशात वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे याची निर्यात केली जात होती. पण भारतात मात्र ही गाडी वापरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. पण आता ही वापरण्यास भारतात परवानगी मिळाल्यामुळे याचा फायदाच अधिक होणार आहे.
वाचा –नवी मुंबईकर पार्किंगमुळे हैराण!
पार्किंगचे ‘नो टेन्शन’
सध्या देशातील मेट्रो सिटीमध्ये सगळ्याचत जास्त प्रदूषण होत आहे. शिवाय नोकऱ्यांसाठी अनेक जण बाहेरुन आल्यामुळे पार्किंगचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण ही क्वाड्रिसायकल इतकी लहान आहे की, ती कमी जागेतही पार्क करता येऊ शकते.
इतर वाहन कंपन्यांनी केला होता विरोध
‘क्वाड्रिसायकल’ वापराला देशात मान्यता मिळाली नव्हती. सुरक्षेचे कारण देत तिला नाकारण्यात आले होते. सुरक्षेचे हेच कारण पुढे करत चारचाकी बनवणाऱ्या अन्य कंपनींनी या नव्या प्रयोगाला विरोध करत कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात या विरोधात २०१२ साली एक याचिका देखील वाहन कंपन्यांनी घेतली होती.