नागालँडमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ११ नागरिकांचा मृत्यू झाला. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर निशाणा साधला आहे. नागलँडमधील घटना हृदयद्रावक असून आपल्याच भूमीत नागरिक सुरक्षित नाहीत. गृहमंत्रालय करतंय तरी काय? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर हल्लाबोल केला आहे. नागलँडमधील घटना हृदयद्रावक आहे. याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावं. इथे ना जनता सुरक्षित आहे ना सुरक्षा कर्मचारी, मग गृहमंत्रालय नेमकं काय करत आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विट करत केला आहे.
This is heart wrenching. GOI must give a real reply.
What exactly is the home ministry doing when neither civilians nor security personnel are safe in our own land?#Nagaland pic.twitter.com/h7uS1LegzJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2021
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोन जिल्ह्यातील ओटिंग येथे घडली. सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारातील अजून तीन जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रचंड जाळपोळ करत सुरक्षा दलाची वाहनेच पेटवून दिली. त्यामुळे नागालँडमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तर, राज्य सरकारने या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.