काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर LPG सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन जोरदार हल्ला चढवला. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत आहे. तसंच, जीडीपीवरुन (GDP) देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
सरकार म्हणतं जीडीपी वाढला आहे. हा जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल. (GDP = Gas, Diesel and Petrol) सरकारने गेल्या ७ वर्षांमध्ये गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आहेत. यातून २३ लाख कोटी रुपये एवढी कमाई केंद्र सरकारने केली असून हे पैसे गेले कुठे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा आणि आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर ४२ टक्क्यांनी आणि डिझेलचे दर ५५ टक्के इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव १०५ रुपये होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात ३२ टक्के घट झाली आहे. गॅसच्या किंमतीत २६ टक्के घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किंमतीत मात्र ११६ टक्के वाढ झाली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
विमुद्रीकरण आणि मुद्रीकरण दोन्ही एकाच वेळी होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींचे चार-पाच मित्र कमाई करत आहेत. मोदीजींनी आधी सांगितलं होतं की मी नोटाबंदी करत आहे आणि अर्थमंत्री सांगत आहेत की मी कमाई करत आहे. शेतकरी, मजूर, लहान दुकानदार, MSMEs, पगारदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपतींवर अन्याय होत आहे.