घरताज्या घडामोडीअध्यक्षपद सोडण्यास तयार, नवा अध्यक्ष शोधा : सोनिया गांधी

अध्यक्षपद सोडण्यास तयार, नवा अध्यक्ष शोधा : सोनिया गांधी

Subscribe

काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ, कार्यक्षम आणि जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्या पत्राला सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर दिले असून पक्षाध्यक्ष पद सोडायला आपण तयार आहोत, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असे सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी होणार्‍या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होईल, असे मानले जाते.

काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ नेत्यांनी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. १५ दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही मुद्दे नेत्यांनी मांडले होते. या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेस कार्यकारी समितीने १० ऑगस्टला पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचे आपण समितीला सांगितले होते. त्याबरोबर हंगामी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लवकरात लवकर पक्षाध्यक्ष पदाची निवड करावी, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सोमवारी होणार्‍या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची मागणी केली आहे. तर दुसर्‍या एका गटाने राहुल गांधींनाच पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचे सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली आहे. यामध्ये काँग्रेस कार्य समितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचे काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवे. काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असे २३ नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी

१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांमध्ये नाहक विलंब.
२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.
३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही.
४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडले.

काँग्रेस नेत्यांच्या मागण्या

१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात
३. गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना
४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.
६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.

पत्रावर यांच्या स्वाक्षर्‍या

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भट्टल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -