बिहारच्या राजकारणात एक मोठं नाट्यमय वळण आलं असून रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोकजनशक्ती पक्षात (LGP) मोठी उलथापालथ झाली आहे. LGP मध्ये मोठी फूट पडली असून पाचही खासदारांनी चिराग पासवान यांची साथ सोडली आहे. या पाच खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून स्वतंत्र मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. हे पाचही खासदार जेडीयूमध्ये जाणार असल्याची शक्यता आहे.
रामविलास पासवान यांचे पुत्र आणि LGP चे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरूद्ध पाच खासदारांनी बंड केलं आहे. पशुपती कुमार पारस पासवान (काक), प्रिंस राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबुब अली केशर या पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड केला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीपासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत जेव्हा LGPने भाजप-जेडीयूपासून विभक्त होऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या पक्षातील लोक चिराग पासवान यांच्यावर नाराज होते. निवडणुकीच्या निकालांनी हे देखील स्पष्ट केलं की चिराग यांच्या पक्षामुळे जेडीयूच्या जागा बर्याच ठिकाणी कमी पडल्या. आता या सगळ्यानंतर जर LGPचे पाच खासदार जेडीयूमध्ये सामील झाले तरम चिरागसमोर मोठं आव्हान उभं राहील.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन राजकारण तापलं
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बदल होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत राजकारण सतत तीव्र होत आहे. दुसरीकडे, जेडीयूमध्येही राजकारण तापलं आहे.
सध्या एनडीए आघाडीत जेडीयूचे १६ खासदार आहेत. गेल्या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी जेडीयूत सामील होण्याची चर्चा होती. तथापि, हे सक्य झालं नाही. आता इथे LGPमध्ये फूट पडल्याच्या बातम्यांनी राजकारणाला नलं वळण मिळालं आहे.