नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत (Pulwama attack) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. आता त्यांना एका कथित विमा गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यावर सत्यपाल मलिक यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
मैंने सच बोलकर कुछ लोगों के पाप उजागर किए हैं।
शायद, इसलिए बुलावा आया है।
मैं किसान का बेटा हूं, घबराऊंगा नहीं।
सच्चाई के साथ खड़ा हूं। #CBI— Satyapal Malik 🇮🇳 (@Satyapalmalik_) April 21, 2023
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या (CRPF) 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावरून जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर अलीकडेच निशाणा साधला. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी एका मुलाखतीत केला होता. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना विमाने दिली नाहीत. सरकारने ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना वीरमरण आले, असे मलिक यांनी या म्हटले होते.
मुंबई शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांनी पुलवामा हल्ल्याबाबत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. मात्र याबाबत कोणताही तपास झालेला नाही. या हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. सैन्याने विमानाची मागणी केली होती, पण ती नाकारण्यात आली. याशिवाय राज्यपालांना गप्प राहण्यास सांगण्यात आले. ही बाब अधिक गंभीर आहे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, असे पवार म्हणाले.
आता सत्यपाल मलिक यांना कथित विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने समन्स बजावले आहेत. त्यांची 27 आणि 28 एप्रिलला सीबीआयसमोर हजर होण्यास सांगितले आहे. खुद्द मलिक यांनीच ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी आता ट्विटरवरून प्रतिक्रियाही दिली आहे. मी सत्य बोलून काही लोकांचे पाप उघड केले आहे. कदाचित म्हणूनच मला बोलावणे आले असेल. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही. सत्याच्या बाजूने उभे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.