शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीए अस्तित्वातच नाही आहे, असं मोठं विधान केलं आहे. शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता एनडीएतील घटक पक्षांचे आणि भाजपचे फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे मजबूत खांब होते. मात्र आता दुसरा खांबही डळमळीत झाला आहे. त्यामुळे एनडीए अस्तित्वात आहे हे मानायला मी तयार नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं. अकाली दल एनडीएतच आहे, ते बाहेर पडले असं आपण म्हणू शकत नाही. त्यांनी फक्त शेतकरी विधेयकावरुन मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संवाद थांबल्याचा हा परिणाम आहे. संवाद राहिला असता तर शिवसेनेलाही मजबुरीने बाहेर पडावं लागलं नसतं, पण तो इतिहास झाला,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“टीडीपीचं काही नक्की नसतं, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने, जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नितीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचं उद्याचं काही सांगू शकत नाही. आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
कृषी विधेयकांवर चर्चाच झालेली नाही. एनडीएत कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा व्हायला हवी होती, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही, राऊतांचे फडणवीसांना उत्तर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. ब्राह्मण असल्याने आपल्याला मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान लक्ष्य केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. महाराष्ट्राने मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अल्पसंख्याक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.