कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आता पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याची शक्यता आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात उष्णता केवळ १० टक्के असल्यामुळे कोरोना विषाणूचे थेंब लवकर नष्ट होणार नाहीत. त्यामुळे ते अनेक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे आयआयटीच्या प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासात उघडकीस आले आहे.
आयआयटी मुंबईमधील प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी देशातील सहा शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तींचा अभ्यास केला. कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर विषाणू थुंकी वाटे बाहेर पडतात. त्यामुळे थुंकीचे थेंब किती वेळ जिवंत राहू शकतात आणि थुंकी सुकण्यासाठी किती वेळ तसेच उष्णता लागते याचा अभ्यास त्यांनी केला. उष्णता कमी असणाऱ्या शहरातील कोरोना रोगाच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता या शहरात कोरोना पाच पट्टीने वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले.
व्यक्तीला कोरोना झाल्यास त्या व्यक्तीला खोकला आणि शिंका येतात. व्यक्ती शिंकल्यानंतर शेकडो विषाणूचे थेंब बाहेर पडतात. हे थेंब सुकून नष्ट होण्यासाठी मोठ्या प्रमाणात उष्णता लागते. मात्र आता पावसाळा येणार असल्याने मुंबईतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. आता जून महिना चालू झाला असून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही दिवसाने मुंबईमध्ये ऊन पूर्णपणे कमी होणार असल्यामुळे उष्णता ८० ते ९० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू नष्ट होणार नसून विविध ठिकाणी तो तसाच जिवंत राहणार असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.