नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर बिहारमध्ये काँग्रेसचं बळ वाढलं आहे. पप्पू यादव यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे. पप्पू यादव यांनी आज दुपारी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये आपल्या पक्षातील इतर नेत्यांसह प्रवेश केला. यावेळी पप्पू यादव यांनी पूर्णिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. (This party in Bihar merged with the Congress before the Lok Sabha elections)
हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत पप्पू यादव म्हणाले की, माझे संपूर्ण कुटुंब काँग्रेसच्या विचारधारेसोबत आणि राहुल गांधींसोबत आहे.राहुल गांधी जगातील सर्वोत्तम नेते आहेत. ते जगातील सर्वात मोठ्या हुकूमशहाविरुद्ध लढत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा विश्वास माझ्यासाठी पुरेसे आहे. संपूर्ण काँग्रेस पक्षाने माझा आदर केला आहे. राहुल गांधींनी 130 कोटी लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे मी आणि तेजस्वी यादव मिळून नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांना पराभूत करू, असा दावाही पप्पू यादव यांनी यावेळी केला.
#WATCH | Jan Adhikar Party chief Pappu Yadav joins the Congress Party, in Delhi. pic.twitter.com/AXdMpOiZtj
— ANI (@ANI) March 20, 2024
पप्पू यादव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, आजपासून आयुष्यभर काँग्रेससोबत राहणार आहे. कारण देशाचे भविष्य राहुल गांधी आहेत आणि त्यांचे पंतप्रधान होण्याचे ध्येय आहे. त्यामुळे तरुण, शेतकरी, महिला, वंचित समाजाला न्याय देण्याचा संकल्प करा, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये दिसते की, ते मंगळवारी रात्री उशिरा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी आरजेडी सुप्रीमो लालू यादव आणि पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बिहारमध्ये भाजपाला शून्यावर बाद करण्याच्या रणनीतीवर आम्ही एकत्र चर्चा केली. बिहारमध्ये भारत आघाडी मजबूत करणे, सीमांचल, कोसी, मिथिलांचलमध्ये 100 टक्के यश हे लक्ष्य असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा पिकनिकला गैरहजर: मुंबई इंडियन्स आणि त्याच्यात अजूनही बिनसलेलेच?
पप्पू यादव कोण?
राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांची बिहारच्या राजकारणात खास ओळख आहे. 1990 मध्ये अपक्ष आमदार म्हणून बिहार विधानसभेत पोहोचल्यावर त्यांची ओळख निर्माण झाली. मधेपुराच्या सिंहेश्वरस्थान विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेल्या पप्पू यादव यांनी अल्पावधीतच कोसी पट्ट्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव वाढवला. 1991 ते 2014 या काळात ते पाच वेळा खासदार होते, पण 2019 मध्ये ते मोदी लाटेत आपली जागा वाचवू शकले नाहीत. आता पप्पू यादव 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्णिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.