जगात जन्म घेतलेल्या तृतीयपंथींना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागतं. त्यातील त्यांच्यावर आलेले बहुतेक प्रसंग हे कठीणच असतात. लोकांचा तिरस्कार, समाजात वाळीत टाकणे, शिक्षण न मिळणं, नोकरी न मिळणं अशा अनेक गोष्टींना तृतीयपंथांना सामोरे जावं लागतं. मात्र, भारतात कलम ३७७ रद्द केल्यानंतर या समाजातील अनेक लोकांनी एक मोकळा श्वास घेतला असून हे जरी कासवाच्या वेगानं जरी असलं तरी या समाजातील लोकांना स्वीकारलं जात आहे. दरम्यान, ओडिशातील एका हॉस्पिटलनं तृतीयपंथांच्या समाजातील लोकांचा स्वीकार करत त्यांना एक संधी दिली आहे. या हॉस्पिटलनं पाच तृतीयपंथींना नोकरीची संधी दिलेली आहे, सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली आहे.
#Malkangiri District Headquarters Hospital authorities set a precedent by roping in five transgenders as security guards to promote workplace equality & empowerment of LGBT community #Odisha pic.twitter.com/u1emaDtj2s
— OTV (@otvnews) November 23, 2019
तुषार, सोनाली, दुर्गा, कैलास आणि हियाल, असं या तृतीयपंथींची नावं असून ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातील, जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (डीएचएच) सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या प्रसूती कक्षात आणि दक्षता विभागात हे तृतीयपंथ काम करतात. तर हॉस्पिटलनं एका खासगी कंपनीला या नोकरीसाठी, ओडिशाच्या निर्मल आयोजने अंतर्गत तृतीयपंथांची नियुक्ती करण्यास संपर्क साधला. निर्मल आयोजना ही सरकारी हॉस्पिटलमध्ये श्रेणीसुधारित आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी काम करते. या नोकरीतून महिन्याचा ६ ते ७ हजाराचा पगार, इतर सुविधा आणि विमा दिला जाणार आहे.
नोकरीसाठी नियुक्ती करण्याआधी या सगळ्या तृतीयपंथींना आवश्यक असलेलं प्रशिक्षण देण्यात आलं. जेणेकरून पुढे नोकरीच्या वेळेस काम करणं सोपं होईल. ओडिशातील एका वृत्तवाहिनीनं या तृतीयपंथींची मुलाखत घेतली ज्यामध्ये कैलास यांनं सांगितलं की ते सगळे ही नोकरी करून फार खूश आहेत.
‘१५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आम्ही ५ जणं इथे कामाला लागलो आणि आम्ही इथे खूप खूश आहोत. आम्ही हॉस्पिटलमध्ये दिवसातले ८ तास असतो ज्यामध्ये आम्ही रुगणांची काळजी घेतो’
– कैलास
जरी ओडिशातील सरकारनं या तृतीयपंथांना स्वीकारून त्यांना नोकरी मिळवून दिली असली तरी अजून बाकी ठिकाणी या तृतीयपंथांना जगण्यासाठी संघर्ष करावं लागत आहे. अजूनही मुंबई सारख्या शहरात या तृतीयपंथांना ट्रेनमध्ये किंवा ट्रैफीक सिग्नलवर भिक मागून आयुष्य काढावं लागत आहे. मात्र, ओडिशाकडून प्रेरणा घेत भारताच्या इतर भागात देखील या तृतीयपंथांना एक संधी देण्यात यावी अशी इच्छा या समाजातील लोकांना नक्कीच असेल.