शबरीमाला मंदिरामध्ये इतिहास घडणार का? याकडे आता साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५५ वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारला जात आहे. त्यावरून सध्या मोठा संघर्ष उभा राहिल्याचं पाहायाला मिळत आहे. पण, आता शुक्रवारी सकाळी मंदिराच्या दिशेने निघालेल्या दोन महिला या मंदिर परिसरामध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, मंदिर परिसरामध्ये संघर्षाची स्थिती कायम आहे. आंदोलकांकडून महिलांच्या मंदिर प्रवेशाला जोरदार विरोध केला जात आहे. त्यामुळे या महिलांना मंदिरामध्ये प्रवेश करताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी देखील दोन महिलांचा अयप्पा मंदिरामध्ये प्रवेशाचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर आता दोन महिला या पुन्हा एकदा मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे. या दोन्ही महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश केल्यास मोठा इतिहास घडणार आहे. हैदराबादमधील मोजो टीव्हीच्या पत्रकार कविता जाक्काल आणि सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या सध्या मंदिर प्रवेशासाठी मंदिर परिसरामध्ये पोहोचल्या आहेत. संघर्षाची स्थिती पाहता पोलिस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास १५० पोलिस या महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेता महिलांना सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट आणि हेल्मेट देखील देण्यात आले आहेत. पोलिसांनी मात्र आम्ही कायद्याचे पालन करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आंदोलकांनी मात्र जीव गेला तरी बेहत्तर महिलांना मंदिर प्रवेश करू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
#Kerala: Journalist Kavitha Jakkal of Hyderabad based Mojo TV and woman activist Rehana Fatima are en-route to the #SabarimalaTemple. pic.twitter.com/IADqXgEJZJ
— ANI (@ANI) 19 October 2018
#Kerala: More visuals from Sannidhanam as protests against the entry of women of all age groups in #SabarimalaTemple continue. pic.twitter.com/GXWX6Zmvoy
— ANI (@ANI) 19 October 2018
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
केरळमधील शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५५ वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशासाठी बंदी होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला भाविकांनी मात्र विरोध दर्शवला आहे. निर्णयाविरोधात केरळमध्ये मोर्चे देखील काढण्यात आले. त्यावरून मोठा संघर्ष देखील उभा राहिला. पण, महिला मात्र मंदिर प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात पोहोचलेल्या महिला मंदिरामध्ये प्रवेश करतात का? याकडे आता सर्व देशाचं लक्ष लागून राहिले आहे.