घरसंपादकीयदिन विशेषकायदे पंडित देशबंधू चित्तरंजन दास

कायदे पंडित देशबंधू चित्तरंजन दास

Subscribe

चित्तरंजन दास यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते होते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १८७० रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय. सी. एस. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. १८९३ मध्ये ते बॅरिस्टर होऊन भारतात परतले.

विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला. शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कोलकात्यास वकिलीस प्रारंभ केला. चित्तरंजन यांनी या काळात ‘मालंच’ (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात त्यांचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.१८९७ मध्ये वंगभंगाची चळवळ सुरू झाली. अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले.

- Advertisement -

अलीपूर बॉम्बकेस म्हणून हा खटला गाजला. अरविंदांकडे पैसे नव्हते. तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडा-गाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोष सुटले (१९०८). त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक खटले विनामूल्य चालविले.स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि १९२३ मध्ये हिंदू-मुस्लीम करार घडवून आणला. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटित आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. अशा या महान कायदे पंडितांचे १६ जून १९२५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -