घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तंव श्रोते म्हणती दैव । कैशी बोलाची हवाव । काय नादातें हन बरब । जिणोनि आली ॥
तेव्हा श्रोते म्हणाले, दैवाची गति काय विचित्र आहे आणि तशीच वर्णन करण्याची शैली तरी काय आहे की, जिच्या सुंदरपणाने नादब्रह्माला जिंकले आहे!
हां हो नवल नोहे देशी । मर्‍हाटी बोलिजे तरी ऐशी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचें ॥
शुद्ध मराठी भाषेत जर अशा रीतीचे वर्णन करिता येते की, ज्याच्यापासून हृदयावर शृंगारादी नवरसाचे निरनिराळे ठसे उमटतात, तर हे अतिशय नवल नव्हे काय!
कैस उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्थु पडे गार । हेचि श्लोकार्थ कुमुदिनी फार । साविया होती ॥
ज्ञानेश्वरांचे हे बोलणे कसे आहे म्हणाल तर ज्ञानरूप चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ असून, त्याच्या भावार्थामुळे मनाला आनंद होतो; म्हणून गीतेच्या श्लोकाचा अर्थ चंद्रविकासी कमलाप्रमाणे सहज उमलला आहे!
चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ॥
त्या बोलण्याची अशी योग्यता आहे की, ब्रह्मविद्या ऐकणाराची इच्छा याच्या श्रवणामुळे तृप्त होते; अशा या बोलापासून श्रोते अंतर्यामी प्रसन्न होऊन डोलू लागले.
तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥
असा श्रोत्यांच्या मनातील भाव निवृत्तिदास ज्ञानदेव यांनी जाणून, मग ‘श्रोतेहो, इकडे लक्ष द्या’ असे ते म्हणाले. कृष्णरूप सूर्याने पांडवकुलाकर प्रकाश केला. श्रीकृष्णानी पांडवावर कृपा केली.
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । का शेखीं उपेगा गेला । पांडवासी ॥
[ तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर ] ज्याला देवकीने आपल्या उदरात नऊ महिने वागविले, यशोदेने अति कष्टाने ज्याला लहानाचे मोठे केले, तो शेवटी पांडवांच्या उपयोगी पडला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -