घरफिचर्सशालीन-गान मैफील

शालीन-गान मैफील

Subscribe

महाराष्ट्राला अभिजात कलेची जराही कमी नाही. कलेच्या अनेक गुणांची पूजा करणारे अनेक कलावंत या राज्याने देशाला दिले. लता मंगेशकरांपासून अगदी आजच्या माडेंसारख्या नवख्या कलाकारांपर्यंतच्या कलाकारांनी महाराष्ट्राचं गायन कलेतलं नाव अजरामर करून ठेवलं आहे. आज त्यामानाने असंख्य साधनांचा पुरवठा गायकांसाठी सज्ज आहे, पण पूर्वी असं काहीही नसताना त्या गायकांनी आपल्या सुरेल आवाजांनी महाराष्ट्रात प्रचंड क्रेझ निर्माण केली होती. कलेची दालनं अनेक मधूर आवाजांनी मराठी कलाकारांनी वाहती ठेवली. पुष्कळ आवाज गाते झाले. प्रत्येकाचा स्वत:चा असा वेगळा आवाज होता. वेगळा आवाज आला की वेगळा लगाव आलाच.

कविता धड्यासारखी वाचून काय दाखवता? जरा गाऊन दाखवा, असं बा.भ.बोरकर म्हणायचे. होय, भावगीतासाठी हे शुभसूचक चिन्ह होते. बा.भ.च्या या शेर्‍यानंतर अनेकजण कविता लकबीने गाऊ लागले. भावगीत हे जनसंगीत आहे. प्रत्येकाला भावगीताशी नाते राखावेसे म्हणूनच शास्त्रीय गायनाच्या मैफली जिंकणारे अनेक गायक भावगीत गाऊ लागले. त्यांच्या मैफिलीत भावगीत नाही, असं होत नाही. या भावगीतांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले.लक्ष्मीबाई जाधव, गंगूबाई हनगल, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, द. वि. पलुस्कर, राम मराठे, वसंतराव देशपांडे अशा नावाजलेल्या सर्वच गायकांनी भावगीतांना आपलेसे केले. याच मालिकेतले महत्त्वाचे नाव म्हणजे गायिका हिराबाई बडोदेकर.

- Advertisement -

‘उपवनी गात कोकिळा
ऋतुराजा जीवाचा दिसला तीज।
रसिकराज तीज दिसला
जीव जीवा सापडला
खुलत चंद्र पाहुनिया कमला जणु।’

हिराबाईंच्या या भावगीताने सारा श्रोत्रूवर्ग मंत्रमुग्ध व्हायचा. कल्याण थाटातील शुद्ध स्वरांचा राग या गीतामध्ये मिश्र स्वरूपात आला आहे. कधी ‘यमन’ अंगाने दिसतो, कधी म, ध, नी हे स्वर शुद्ध तर कधी कोमलसुद्धा दिसतात. म्युझिक पीसने सुरू होणार्‍या या गीतात तालाबरहुकूम घेतलेल्या छोट्या ताना, मोठ्या दमसासच्या ताना व आलाप याची बरसात आहे. हे सर्व गाताना शब्द व आशय याला कुठेही धक्का नाही. या हिराबाई बडोदेकर यांच्या गीतात किंवा गायनात अशक्य हा शब्द नाही. त्यामुळे शास्त्रीय बाजाने भरलेले हे भावगीत रसिकांच्या आवडीचे झाले. हिराबाई आपल्या मैफलीत हे गीत गाऊ लागल्या. भावगीताला त्या शास्त्रीय पेहराव चढवायच्या. ‘उपवनी’ हे गीत त्या अर्धा-पाऊण तास सहजतेने गायच्या. त्यामुळे उपवनातून आलेली कोकिळा गायनात सर्वस्व पणाला लावून पंचम स्वर लावते आहे हा अनुभव अनेकांनी घेतला.

- Advertisement -

गीतकार वसंत शांताराम देसाई 1925 या वर्षी हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘पुन्हा गाते’ असे त्याच म्हणाल्या. तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. वसंत देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात.. या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. 1937 मध्ये ओडियन कंपनीने ही ध्वनिमुद्रिका बाजारात आणली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाट्यपदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत गायची व त्यामुळे मुलगी पसंत व्हायची!’

21 डिसेंबर 1921 या दिवशी पं. पलुस्कर यांच्या आग्रहाखातर हिराबाईंनी गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर जवळजवळ तीन पिढ्यांसाठी त्या गात राहिल्या. आपल्या गायनाच्या कार्यक्रमाला तिकीट लावून सादरीकरण करणार्‍या हिराबाई या पहिल्या गायिका, असे म्हणता येईल. सरस्वती राणे या आपल्या भगिनीसमवेत शास्त्रीय गायनाची जुगलबंदी सादर करणार्‍या हिराबाई या पहिल्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. त्या काळात हिराबाईंनी ठरवले की, शांतपणे बैठकीवर बसून, हातवारे न करता, शिस्तीने सादर केलेले गाणे ऐकायची श्रोत्यांना सवय लावायची व स्त्रियांच्या शालीन गान-मैफलीचा पायंडा पाडायचा. भारतीय संगीताला मिळालेली ही मोठी देणगी आहे.

हिराबाईंचे गायन ऐकले की भरजरी शालू नेसलेली, हातात पूजापात्र व डोईवर पदर घेतलेली, नाकात नथ घातलेली आणि तुळशीबागेतील रामदर्शनाला लगबगीने निघालेली एक कुलशीलवती समोर उभी राहते, असे वर्णन ह.रा.महाजनींनी केले होते. स्त्री गायिकांच्या मैफलीचा पाया हिराबाईंनी घातला हे लक्षात ठेवले पाहिजे.’ ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत लोकप्रिय झाल्यानंतर वसंत देसाई यांनी हिराबाईंसाठी आणखी भावपदे लिहिली. कोलंबिया कंपनीने ध्वनिमुद्रिका काढल्या. अख्तरीबाईंच्या एका भैरवीच्या चालीवर ‘धन्य जन्म जाहला’ हे गीत आले. त्यानंतरच्या काळात हिराबाईंसाठी मो. ग. रांगणेकर, ना. सी. फडके, स. अ. शुक्ल यांनी पदे लिहिली. या गीतांबरोबर ‘विनवित शबरी रघुराया’ आणि जी. के. दातार यांचे ‘नंदलाला नाच रे’ या ध्वनिमुद्रिका आल्या.

या दोन्ही रचना गायक,गीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केल्या. लेखक राजाराम हुमणे यांनी बाबूजींना जेव्हा या दोन्ही गीतांची आठवण करून दिली तेव्हा बाबूजी म्हणाले, ‘या गीतांच्या स्वररचना करायच्या आणि त्या हिराबाईंना सांगायच्या या कल्पनेनेच शहारून आले, मनावर दडपण आले, संकोच वाटू लागला. कारण हिराबाई आणि बालगंधर्व यांना मी मनोमनी गुरू केले होते. मोहोळातून मध ठिबकावा असे हिराबाईंचे गायन मी कानात साठवले. हिराबाई म्हणाल्या, ‘तुम्ही मला चाल शिकवा, त्याबरहुकूम मी म्हणेन.’ हिराबाईंच्या या बोलण्यामुळे माझी भीती दूर झाली. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून त्या शिकल्या ही फार मोठी गोष्ट आहे.’

हिराबाईंची मैफल ऐकल्यानंतर रसिक म्हणायचे- ‘चंपूताईंनी ‘उपवनी गात कोकिळा’ काय म्हटलंय?’ तेवढ्यात एखादा नवा रसिक ‘चंपूताई कोण?’ असा प्रश्न विचारीत असे. हिराबाईंना त्यांची भावंडं ‘चंपूताई’ म्हणत.

त्या वेळचा मुंबईकर म्हणत असे- ‘हिराबाईंच्या गाण्याबद्दल बोलूच नका हो..’ हॉटेलातल्या कपात ब्रून मस्का बुडवत तो पुढे सांगे, ‘मी सांगतो ऐका.. इराण्याचा चहा आणि हिराबाईंचं गाणं.. आकाश कोसळलं तरी यांची क्वालिटी सेम टु सेम.. काय समजलेत?’

‘तार षड्ज’ हा हिराबाईंच्या गळ्यातला हुकमी एक्का असे. हिराबाईंचे कर्तृत्व उत्तमरीत्या ग्रंथबद्ध करणारे लेखक राजाराम हुमणे अर्पणपत्रिकेत लिहितात – ‘हिराबाईंच्या अविस्मरणीय आणि अद्वितीय तार षड्जाला..’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -