सामान्य मुंबईकर ज्यांच्यावर परवडणाऱ्या घरांसाठी अवलंबून असतो, त्या म्हाडाकडून त्यांची निराशा होत असल्याचं चित्र सध्या मुंबईत दिसत आहे. आणि फक्त निराशाच नसून काही ठिकाणी तर चक्क लूटच होत असल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. आणि हा आरोप या सगळ्या कथित घोटाळ्यामधल्या पीडितांकडूनच केला जात असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य असण्याची दाट शक्यता आहे. पण आता या सगळ्या प्रकाराचा उच्चांकच गाठला जातोय की काय? असा प्रश्न पडावा अशी प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. १९७७मध्ये गिरगावात राहणाऱ्या पवार कुटुंबियांची तर अशीच परिस्थिती झाली आहे. कारण म्हाडानेच दिलेल्या वायद्यानुसार ते गेल्या ४० वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत संक्रमण शिबिरात राहात आहेत. आणि तेही अक्षरश: जीव मुठीत घेऊन!
मास्टर लिस्टमध्ये नाव, पण घरच नाही!
१९७७मध्ये आनंद पवार २४ वर्षांचे होते. गिरगाव येथील कुंभारवाड्यातील सावी गल्लीतील इमारत क्र. १७४ हा पडल्याने म्हाडाने आनंद पवार यांना बोरीवली पश्चिमेतील एमएचबी कॉलनीतील इमारत क्र. १५ या संक्रमण शिबीरात त्यांना घरं दिले. म्हाडाकडून त्यांना दुसरीकडे घर देण्याचा वायदा देखील करण्यात आला. नंतर आलेल्या मास्टर लिस्टमध्ये त्यांचं नाव देखील समाविष्ट करण्यात आलं. पण त्यांच्या पदरात घर मात्र पडलं नाही. आणि गेल्या ४० वर्षांपासून तेच स्वत:च्या हक्काचं घर मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण म्हाडा मात्र त्यांना पुन्हा संक्रमण शिबिरातच राहाण्यासाठी भाग पाडत असून घराच्या मागणीला टोलवलं जात आहे.
मास्टर लिस्टमधील घरावर पवार यांच्यासारख्या लोकांचा अधिकार आहे. अधिकारी मूळ भाडेकरुकडून घरे विकत घेतात आणि आपल्या मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने घरांचे वितरण करत असतात. याबाबत आम्ही आवाज उठवला पण काहीच झाले नाही.
अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन
संक्रमण शिबीर नव्हे, तो तर पडका वाडाच!
आज पवार बोरीवलीत जिथे राहात आहेत, ती इमारत कधीही कोसळेल अशी तिची अवस्था झाली आहे. त्यामुळे मास्टर लिस्टमध्ये नाव असूनही म्हाडा का घरं देत नाही? असा सवाल आनंद पवार यांनी उपस्थित केलाय. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही मास्टर लिस्टमधील घरे अधिकारी आपल्या नातेवाईकांना मिळावीत म्हणून दिरंगाई करत असल्याचा आरोप देखील आता संक्रमण शिबिरातील रहिवासी करत आहेत.
४० वर्षांत या मुख्यमंत्र्यांना पत्र
गेल्या ४० वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देखमुख, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आनंद पवार यांनी पत्र व्यवहार केला. तसेच युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी पत्रव्यवहार केला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर सचिन अहिर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना देखील त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याचा त्यांना काहीएक फायदा झालेला नाही.