घरफिचर्ससारांशसह्याद्रीच्या कुशीत दडलेलं मोरपंखी पान - रावरंभा....

सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं मोरपंखी पान – रावरंभा….

Subscribe

महाराष्ट्राच्या इतिहासातली महापराक्रमी कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एका उपकथानकावर दिग्दर्शक अनुप जगदाळेनं ‘रावरंभा’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा ‘रावरंभा’ वेगळा ठरतो. म्हणूनच हा सिनेमा सुरुवातीपासूनच आपले लक्ष वेधून मनाचा ठाव घेत जातो.

– -आशिष निनगुरकर

फलटणचे बजाजी निंबाळकरांचे पुत्र महादजी निंबाळकर आणि महादजींचे पुत्र म्हणजे रावरंभा! ‘रावरंभा’ म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं एक मोरपंखी पान आहे. त्या पंखावरील सप्तरंग प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे पहायला मिळतील. शिवकाळाचा अभ्यास करीत असताना लेखक प्रताप गंगावणे यांच्या लक्षात आलं की इतिहासातील नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर यांच्यासारखी महत्त्वाची माणसं आपल्याला माहिती आहेत, पण सर्वसामान्य मावळ्यांबद्दल फारसं कुठं लिहिलेलं, चित्रीत केलेलं पहायला मिळत नाही. म्हणून मग प्रतापराव गुजरांसोबत असलेल्या सहा मावळ्यांपैकी एकाची ही कथा आहे. त्यातला ‘रावजी’ हा आपल्या चित्रपटाचा नायक आहे. रावरंभा ही दिलेली पदवी आहे, त्यांचे मूळ नाव आहे रंभाजी बाजी! रावरंभा म्हणजे सतत जिंकणारा होय!

- Advertisement -

‘रावरंभा’ तून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळतात. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरावा असा सजला आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरला आहे. शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.‘बेभान’, ‘झाला बोभाटा’,‘भिरकीट’,‘करंट’ असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपार्‍यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच ‘रावरंभा’ या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. ही एक प्रेमकथा आहे. रावची (ओम भुतकर) प्रेयसी रंभा यांची प्रेमकहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पहायला मिळतो. कथा रंजक असली, तरी मांडणीत विस्कळीतपणा जाणवतो. काही ठिकाणी प्रसंगांची जुळवाजुळव आणि कथानकाचा प्रवास रटाळ, तुटक वाटतो. पटकथा ढिसाळ असल्यानं पूर्वार्धात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत नाही; पण उत्तरार्धातील रंजक वळणं सिनेमात गुंतवून ठेवतात. कलादिग्दर्शक वासू पाटीलनं मंदिर, राजवाडा, गाव आणि युद्धभूमीचा डोलारा खुबीनं उभा केलाय.

- Advertisement -

रायगड किल्ल्यावरील घोडेस्वारीच्या खेळात रावजी (ओम भुतकर) चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खूश होऊन छत्रपती शिवाजी महाराज (शंतनू मोघे) त्याला सोन्याचं कड देतात आणि प्रतापराव गुजर (अशोक समर्थ) यांना रावजीची अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात; त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. दरम्यान, बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावांबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथली रंभा (मोनालिसा बागल) आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशुव्यापारी जालिंदरची (संतोष जुवेकर) रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहीतील कुरबतखान (कुशल बद्रिके) याच्या मदतीनं जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यांतून राव रंभाला कसं वाचवतो यांसह अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं सिनेमात मिळतात.

ओम भूतकर अभिनयाचा अपेक्षित ठसा उमटवू शकलेला नाही. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ यांचा अभिनय चौकटीतला वाटतो. शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चपखल बसला आहे. मोनालिसा बागलनं रंभा ही भूमिका आत्मविश्वासानं निभावली आहे. सर्वाधिक भाव खाऊन जातो, तो संतोष जुवेकर. संजय जाधवच्या छायांकनामुळे सिनेमा विशिष्ट आकार घेतो. आदर्श शिंदे, अमितराज, आनंदी जोशी, आदित्य बेडेकर यांचा सांगीतिक साज सिनेमाला उजळ बनवतो. पौर्णिमा ओक यांनी वेशभूषाकार म्हणून उजवं काम केलंय. एकदंरच, सिनेमा एकदा पाहण्यासाठी रंजक आहे.

१६७४ साली इतिहासात घडलेली एक प्रेम कहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचे लेखन केलेले असून अनुप अशोक जगदाळे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. शशिकांत पवार प्रोडक्शन्सने या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. आपल्या इतिहासात जरी हे पान समोर आले नसले तरीदेखील त्यांचे कार्य खूप मोठे आहे. इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. छत्रपती घराण्याच्या सोबत निंबाळकर घराणेदेखील प्रसिद्ध होते. निंबाळकर घराण्याने स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत लढाया केल्या आहेत.

ऐतिहासिक चित्रपटांची सध्या रांग लागली आहे, पण या चित्रपटात खूप वेगळेपण आहे. इतिहासामधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आपल्याला ठाऊक आहेत, पण काही असे मावळे आहेत की जे आपल्याला माहीतच नव्हते. इतिहासाच्या उदरात गुडूप झालेलं एक सोनेरी पान म्हणजे ‘रावरंभा’ हा चित्रपट आहे. प्रतापराव गुजरांसोबत असलेल्या वीरांपैकी एक वीर म्हणजे हा रावजी आहे. त्याची ही प्रेमकथा आहे आणि त्यातून सगळा इतिहासाचा पट उलगडत जातो.

इतिहासात गाजलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसंच होती. यांना पण आनंद, दुःख, यातना, चिडचिड असे माणूसपणाचे सगळे कंगोरे होते. या सर्व पात्रांचं ‘नॉर्मल’पण या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटातील गीतांना आपल्या मातीचा गंध असून शिवकाळात घेऊन जाणारी, मनाला भिडतील अशी ही गाणी करताना खूप समाधान मिळालं. ‘साथ साथ’, ‘हां मर्दा’ अशी स्फुरण चढणारी गीते आणि ‘तुझ्या दावणीला’, ‘एक रंभा एक राव’ या प्रेमगीताचा नजराणा चित्रपटातील गीत-संगीतातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. ऐतिहसिक चित्रपटाची मोट बांधणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असतं. अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते यांचं संपूर्ण सहकार्य हवं असतं. त्यामुळे या सिनेमाला मिळालेला पाठिंबा हेच या सिनेमाचे यश आहे. सिनेमा भव्यदिव्य झाला आहे, सिनेमागृहात जाऊन हा अनुभव घ्यायला हवाच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -