घरफिचर्ससारांशश्रावणातला निसर्गरम्य कोकण!

श्रावणातला निसर्गरम्य कोकण!

Subscribe

श्रावण म्हटले की आजही माझ्या डोळ्यांसमोर कोकणातील नयनरम्य निसर्ग उभा राहत असतो. श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्यानाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. भातलावणीची कामे आटोपून नाचणी टोवण्याची कामे सुरू झालेली असतात. शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करीत असतो. श्रावणात येणारे सण हे कोकणात अगदी आनंदाने साजरे केले जातात.

– मानसी सावर्डेकर

श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वांच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी कितीतरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. जो तो आपापल्या परीने व्रतवैकल्य, उपासतापास करीत असतो. माणसाच्या गरजा या वेगवेगळ्या असतात आणि या गरजा माणसाला आनंद निर्माण करून देत असतात. जगात सुखी असा कोण आहे हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे माणसांच्या गरजांच्या चक्राप्रमाणे त्याचा आनंद सादर होतो. म्हणून श्रावण तुम्हाला कसा वाटला, कसा भावला हे माणसागणिक अगदी वेगवेगळे असते.

- Advertisement -

मुळात श्रावण हा शब्दच ऊर्जा देणारा आहे. अगदी गरिबांपासून श्रीमंतापर्यंत श्रावण हा मनाच्या कोपर्‍यात अगदी घर करून बसलेला असतो. श्रावण हा शब्द येताच प्रथम ‘श्रावणात घननिळा बरसला…’ हे लताताईंचे शब्द आपल्या ओठांवर तरळू लागतात. श्रावण हा ऋतूच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो. निसर्गाची किमया म्हणावी तर या दिवसांत उधळण करीत असतो. सारा निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो. कोकणातील श्रावण नयनरम्य असतो, असे म्हणायला काहीच हरकत नाही. निसर्गाने कोकणावर जणू अलंकाराची उधळणच केली आहे.

माझे मन हे कोकणातील नयनरम्य अशा निसर्गातच अडकले. माझ्या कोकणची माती मला नेहमीच साद घालत असते. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा, माडांच्या रांगा, आंबा, काजू, कोकमाची, फणसाची झाडं आणि अथांग समुद व मोठमोठ्या नद्या. असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. कोकणातील खूपशी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. लोटे परशुराम, वेळणेश्वर, गणपतीपुळे, हेदवी, डेरवण, पावस, मार्लेश्वर, पण काही ठिकाणं खूप सुंदर असूनसुद्धा अपरिचित जरा हटके आहेत.

- Advertisement -

श्रावण म्हटलं की आजही माझ्या डोळ्यांसमोर कोकणातील नयनरम्य निसर्ग उभा राहत असतो. श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्यानाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. भातलावणीची कामे आटोपून नाचणी टोवण्याची कामे सुरू झालेली असतात. शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करीत असतो. श्रावणात येणारे सण हे कोकणात अगदी आनंदाने साजरे केले जातात. सण कसे साजरे केले जातात हे आपल्याला कोकणात दिसून येतं, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

या काळात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, नागपंचमी, जन्माष्टमी, दहीकाला हे सण कसे साजरे करावेत याचा आदर्श आपण कोकणातून घ्यावा. कुठलाही गाजावाजा न करता अगदी भक्तिभावाने हे सण साजरे केले जातात. कोकण हा भौगोलिकदृष्ठ्या डोंगर-नद्या-नाले- टेकड्या यांनी व्यापलेला आहे. श्रावणामध्ये निसर्गाच्या सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते. हिरवागार निसर्ग, वाहणारे नद्या-नाले हे सगळं अगदी विलोभनीय. श्रावणात पडणारा पाऊस हादेखील जणू जिवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहचवणारा पाऊस अगदी उन्हाबरोबर लपंडाव खेळत असतो.

आम्ही लग्न झाल्यावर पहिल्यांदाच श्रावण अनुभवण्यासाठी आमच्या गावी सावर्डे (चिपळूण) येथे गेलो. रात्रीची गाडी पकडून सकाळी कोकणात पोहचणार होतो. एवढा लांबचा प्रवास मी कधीच केला नव्हता. सकाळी ४ वाजता गरमागरम चहा घेतला. पुढे निघालो तर वाशिष्ठी नदी धुक्याची दुलई पांघरून आमचं स्वागत करायला तयार होती. सकाळी धुक्यातून गाडी जाताना काश्मीरलाही मागे टाकणारं सृष्टीसौंदर्य दृष्टीस पडत होतं. कधीही कोकण न पाहिलेली मी फारच भारावून गेले. सूर्यराजाचे स्वागत करायला या मस्त वातावरणात सावर्डा कधी आलं आम्हाला समजलंही नाही. सकाळी ८ वाजता आम्ही सावर्ड्याला पोहचलो. आमचे नवीन लग्न झाले होते. त्यामुळे आमचे भाचे कंपनी, पुतण्या, दीर, नणंदा यांना तर किती करू आणि किती नाही असे झाले होते.

सावर्डे येेेेथे आमचे मोठे घर आहे. सगळ्यांनाच भूक लागली होती. आम्ही चहा आणि दडपेपोह्यांचा आस्वाद घेतला. आचारी काकांना काय स्वयंपाक करायचा ते सांगून आवरून सगळे तयार झाले वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी. हो, आम्ही वनभोजन करायचं आधीच ठरवलं होतं. आमचं सावर्ड्याजवळ दहिवली येथे शेत आहे. तिथे आंब्याची, केळीचीही झाडे आहेत. टुमदार घर आहे. मुलांनी तिथे चूल पेटवली आणि त्यावर काही पदार्थही केले. वनभोजन मस्त झालं. भरपूर फोटो काढले. लहान मुलांनी पोहण्याचा आनंद लुटला. संध्याकाळी सावर्ड्याला परतलो. रात्रीचा मिसळीचा बेत होता. सगळ्यांनी मिसळीवर ताव मारला. सगळेच दमले होते. छान झोप लागली.

सकाळी नाष्टा करून आम्ही आमच्या ग्रामदेवतेचे कुलदेवाचे दर्शन घेतले आणि गुहागर बीचवर गेलो. दुपारचे जेवण आम्ही आचारी काकांकडून बनवून घेतले होते. बीचवर जेवण केले. तिथल्या साहसी खेळांचा आनंद घेतला. संध्याकाळी सावर्ड्याला आलो. त्याच्या नंतरच्या दिवशी आम्ही सगळे सावर्ड्यापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर मालदोली बंदर आहे. तेथे कोकण क्रोकोडाईल सफारी आहे तिथे गेलो. चिपळूण गुहागर मार्गावर आत शिरल्यावर प्रत्येक ठिकाणी श्री. संदेश संसारे यांचे कोकण क्रोकोडाईल सफारीचे फलक लावलेले आपल्याला दिसतात.

मालदोलीला पोहचल्यावर वाशिष्ठी नदीचे विशाल पात्र आपल्या दृष्टीस पडते. नदीत जाण्यासाठी तेथे मोटार बोटींची सोय केली आहे. बोटीतून प्रवास करतानाचा अनुभव खूपच छान होता. अंदाजे ३ किलोमीटर आत गेल्यावर आपल्याला क्रोकोडाईल (मगरी) दिसायला लागतात. आपल्या बोटींजवळ मगरी येतात, पण आपल्याला काहीही इजा करीत नाहीत. अस्ताला जाणारा सूर्य आणि मगरींचे स्वछंद विहार करतानाचे दृष्य डोळ्यांत साठवून ठेवावेसे वाटते. मनसोक्त फोटो व शूटिंगचा आनंद घेता येतो. आम्ही बोटीत जवळजवळ तासभर मनसोक्त भटकलो. ठिकाण खूपच स्वच्छ आहे.

मला कोकणातील श्रावण महिन्याचा अनुभव घ्यायचा असल्यामुळे मी आणि माझे पती काही दिवसांची सुट्टी काढून तेथेच राहण्याचे ठरवले. बाकी सगळे मुंबईत परतले. दुसर्‍या दिवशीपासून श्रावण सुरू झाला. म्हणजे सणावारांची सुरुवात होत असे. नागपंचमीची मज्जा तर विचारू नका. दहा-दहा दिवस अगोदर माती आणून बनवलेला नाग, त्याचे रंगकाम आणि नागपंचमीच्या दिवशी बसवलेला नाग, त्याची पूजा आजही लक्षात आहे. नागाची पूजा झाल्यावर आम्ही सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुलींनी फुगड्या घातल्या, गाणी म्हटली, झोके घेतले. नागपंचमीच्या दिवसापासून जाखडी नृत्याची तालीम सुरू होत असे. ती अगदी गणपती येईपर्यंत. मंगळागौरीला तर विचारूच नका, इतकी धमाल की बास. जिची मंगळागौर असायची तिच्या घरी आदल्या दिवशीपासून तयारी करायची. मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ खेळलो. जिची मंगळागौर तिने मौन घेऊन जेवायचे. बाकीच्यांनी तिला बोलण्यासाठी उचकवायचे. किती मज्जा ती.

जन्माष्टमीच्या दिवशी जागवलेली रात्र आणि दुसर्‍या दिवशी साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव हा जणू एकात्मतेचे प्रतीक. दहीहंडी उत्सव कसा साजरा करावा हे आजच्या शहरातील लोकांनी गावातील लोकांकडून शिकले पाहिजे. श्रावणी सोमवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी धरलेले उपवास, श्रावणात घडवल्या जाणार्‍या विलोभनीय अशा गणपतीच्या मूर्ती, असा हा विलोभनीय श्रावण अगदी सर्वांना हवाहवासा वाटतो. आजच्या या सिमेंटच्या युगात खरंच ती मजा हरवल्यासारखी वाटते. मुंबईमधील सण आता कृत्रिम वाटू लागले आहेत. अशा वेळी कोकणातले श्रावणातले विलोभनीय असे दिवस आठवतात. तेच दिवस माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग भरतील यात शंका नाही. काही दिवसांत जीवनाचा आनंद मनसोक्त लुटून घेतला आणि फ्रेश मूडमध्ये गावाच्या आठवणींची आयुष्यभराची शिदोरी घेऊन आम्ही परतीला निघालो खरे, पण माझे मन मला परत परत कोकणाकडे वळवत होते. किती रम्य होते ते कोकणातील दिवस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -