घरताज्या घडामोडीस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज

Subscribe

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. मे १६६६ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेले होते. वयाच्या नवव्या वर्षीच ते मोगली मनसबदार बनले. त्यांना १६७१-७४ दरम्यान राज्य कारभाराचा अनुभव यावा, म्हणून महाराजांनी महादजी यमाजी हा वाकेनिवीस दिला. १६७२ पासून त्यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला.

रायगडावर स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजीराजांचा बहुतेक काळ शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यातच गेला. त्यांची एकूण कारकीर्द नऊ वर्षांची. त्या सबंध काळात सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, वाडीकर सावंत, दळवी यांच्याशी त्यांना मुकाबला करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांनी अष्टप्रधानांद्वारे राज्यव्यवस्था चालू ठेवली. मात्र, कवी कलशाची त्यांनी छंदोगामात्य या नवीन पदावर नियुक्ती केली. वतनाचे निवाडे, किल्ल्यांची निगराणी तसेच जमिनीचे महसूल पूर्वापार पद्धतीने चालत होते, तेच त्यांनी पुढे चालू ठेवले. आयात-निर्यात कर तसेच खंडणी व चौथाईची वसुली व्यवस्थितपणे होत होती. १६८६-८७ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी पुनर्वसनासाठी कौलनामे दिले.

- Advertisement -

व्यापार्‍यांना सवलती देऊन महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न केला. सैनिकी व्यवस्थेत घोडदळ, पायदळ, तोफखाना तसेच समुद्रावरील शत्रूशी लढण्यासाठी कार्यक्षम नौदल निर्माण केले. छत्रपती संभाजी महाराजांकडे धैर्य, शौर्य आणि धडाडी हे सेनापतीला आवश्यक सर्व गुण होते. लढायांतील त्यांचे नेतृत्व विलक्षण चापल्याचे आणि प्रशंसनीय असे होते. छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण पुढे चालू ठेवून अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. अशा या महान पराक्रमी राजाचे ११ मार्च १६८९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -