नाशिक येथे राहणाऱ्या अपर्णा अभय नाईक यांच्या घरी मागच्या ५० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असतो. विशेष म्हणजे त्या स्वतःच्या हाताने शाडूच्या मातीपासून घरीच मूर्ती साकारतात.
यावर्षी सजावटीसाठी त्यांनी कोरोनाचा विषय निवडलेला आहे. सध्या प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यासाठी गजानन विजय या गजानन महाराजांच्या पोथी मधील २१ अध्यायातील बोध लोकांना संदेश म्हणून दाखवला आहे. या बोधा नुसार प्रत्येकाने आचरण करावे. योग आणि प्राणायाम करून शरीर व मनाचे स्वास्थ्य जपले पाहिजे. मग आपण नक्कीच कोरोनावर मात करू शकतो, असा सकारात्मक संदेश अपर्णा नाईक यांनी दिला आहे.
आपण आपले मन भक्ती मार्गाकडे वळवले की आपोआप चांगले विचार मनात येतात आणि मानसिक स्वास्थ जपले जाते, आरोग्यही सुधारते हेच या देखाव्यातून सूचित करायचे असल्याचे अपर्णा नाईक यांनी सांगितले. या देखाव्यासाठी वेलवेट पेपर, कार्ड शीट पेपर, घरी बनविलेल्या मातीच्या कुंड्या, खोके, लेस इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे.