रविवारी राज्यात आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे ५५२ कोरोनारुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४२०० इतकी झाली आहे. त्याचवेळी बरे होऊन घरी जाणार्या कोरोनारुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यांची संख्या ५०७ वर पोहचली आहे. रविवारी राज्यात १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमध्ये रविवारी कोरोनाचे १३५ नवे रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या २७९८ वर पोहचली आहे. तर ६ जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने मृतांचा आकडा १३१ वर पोहचला आहे.
आज राज्यात १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ४ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ७५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२,०२३ नमुन्यांपैकी ६७,६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७,२५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.