घरमहाराष्ट्रराज्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार, दहावी - बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार, दहावी – बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Subscribe

मुंबई : दहावी, बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जनजागृती मोहीम तर राबविण्यात येईलच; पण पोलिसांची मदत देखील घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार असून कलम 144 म्हणजेच जमावबंदीच्या अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात येतील. तसेच परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत कॉपीमुक्त अभियानावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यावर विस्त़ृत सादरीकरण केले. श्रीकर परदेशी हे जेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी होते, तेव्हा त्यांनी नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले होते आणि त्याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसले होते.

- Advertisement -

या अभियानात राज्याचा “नोडल अधिकारी” म्हणून शिक्षण आयुक्त आणि प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच “समन्वयक अधिकारी” म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच “कॉपीमुक्त अभियान” राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रिकरण करण्यात यावे असे ठरले.

शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करण्यात येणार आहे. माध्यमांद्वारे शाळा आणि पालकांशी संवाद साधून जनजागृती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10वीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -