शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे संगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर असा हा दोन दिवसीय अयोध्या दौरा वादाचा विषय ठरला आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्यातील परवानग्यांचा प्रस्ताव चार आयुक्तांच्या चौकशीच्या फेर्यात अडकला असून, या दौऱ्यावरुन राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांना टार्गेटही केलं आहे. अशातच आता मनोरंजन विश्वातूनही उद्धव ठाकरेंच्या राममंदिर दौऱ्यावर टीका करण्यात आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता-लेखक हेमंत ढोमे याने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अयोध्या दौऱ्याबाबत हेमंत ढोमेंना पडलेले काही प्रश्न त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून थेट विचारले आहेत. ‘राम मंदिर बांधून दुष्काळ मिटेल का? आत्महत्या थांबतील का? तसंच गिरीबी नष्ट होईल का?’ असे अनेक प्रश्न हेमंतने त्याच्या ट्वीटर अकाउंटवरुन विचारले आहेत. या प्रश्नांबाबत हेमंत ढोमेंनी दोन वेगवेगळी ट्वीट केली आहेत. हेमंत ढोमेने उध्दव ठाकरे यांना असे थेट प्रश्न विचारल्यामुळे, पुन्हा एकदा त्यांच्या अयोध्या दौरा वादात आला आहे. हेमंत ढोमे नेहमीच आपली मतं सोशल मीडियावरुन व्यक्त करत असतो. मात्र, यावेळी त्याने थेट अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधल्यामुळे त्यांचं ट्वीट अधिकच चर्चेत आलं आहे.
पाहा नेमके प्रश्न काय…
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आयोध्येला जाणार… का? काय संबंध? म्हणजे काय करायचय नेमकं? अहो मातीत चाललेले त्यांचे गडकिल्ले बांधायचं बघा आधी! हातचं सोडुन पळत्याच्या मागे लागायची जुनी खोड! #येडेबागडे #फाल्तुची_इव्हेंटबाजी
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 22, 2018
बरं हे रवाना झाले म्हणे! काही प्रांजळ प्रश्न पडलेत, ते मंदिर बांधुन दुष्काळ मिटेल? शेतकरी आत्महत्या थांबतील? गरिबी जाईल? भुकबळी थांबतील? दरवाढ कमी होईल? मरण स्वस्त होईल? अन्न, वस्त्र, निवारा सग्गळं मिळेल? तसं होणार असेल तर चला सगळेच जाऊ अयोध्येला! #येडेबागडे
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 22, 2018
याआधी हेमंत ढोमेने अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातही आपली प्रतिक्रिया दिली होती. हेमंत राजकीय विषयांवर अनेकदा भाष्य करत असतो. ‘बघतोस काय मुजरा कर’ या गाजलेल्या चित्रपटांत हेमंत ढोमेने महत्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटांत महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी बांधलेले गड-किल्ले ही महाराष्ट्राची शान असून, या वैभवाकडे आजच्या तरूणांचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.