मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटी खराब हवामानामुळे पुन्हा एकदा माघारी फिरल्या असून, रायगडसह अन्य जिल्ह्यांतील, तसेच गोवा,गुजरात राज्यातील शेकडो बोटींनी आगरदांडा, दिघी बंदरात आश्रय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्रात निर्माण होणार्या वादळी हवामानामुळे मच्छिमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. नारळी पौर्णिमेच्या दरम्यानही खराब हवामानामुळे बोटी माघारी परतल्या होत्या.
आगरदांडा व दिघी बंदरात सर्वाधिक बोटी नांगरून ठेवल्यामुळे जिकडे पहावे तिकडे बोटीचं बोटी दिसत आहेत. या संदर्भात गुजरातमधील काही बोट चालकांशी ‘आपलं महानगर’ने संपर्क करून बंदरात प्रशासनाची मदत मिळते का, त्यांनी बोट तपासणी करण्याच्या नावाखाली अधिकारी येतात व विविध कागदपत्रे तपासताना जर एखादा कागद नसेल तर आम्ही बोट मालकाशी संपर्क करून व्हाट्सअॅपवर तो मागून घेत असल्याचे सांगितले. आम्हाला जाणून-बुजून अशी कागदपत्रे चालणार नसल्याचे सांगून दंड रक्कम आकारात असल्याचीही व्यथा मांडली. आठ दिवसांपासून प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही सांगण्यात आले.
मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी सुरेंद्र गावडे यांच्याशी संपर्क साधला असता आगरदांडा बंदरात गुजरात, गोवा आदी ठिकाणहून 300 हून अधिक बोटी आश्रयासाठी थांबल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रेवदंडा व रेवस खाडीत सुद्धा अनेक बोटी स्थिरावल्याचे ते म्हणाले. खराब हवामानामुळे ज्या बोटी किनार्यावर उभ्या आहेत त्यावरील खलाशांना औषध, पाणी व तत्सम मदत करण्याची सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने स्थानिक मच्छीमार सोसायट्यांना केल्याचे ते म्हणाले. आमचा कोणताही अधिकारी या बोटीवरींल खलाशांना त्रास देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारपर्यंत हवामान व्यवस्थित होईल असा अंदाज आहे.