घरमहाराष्ट्रबैलगाडा शर्यतीची परंपरा अधिक समृद्ध होईल; अजित पवारांकडून निकालाचे स्वागत

बैलगाडा शर्यतीची परंपरा अधिक समृद्ध होईल; अजित पवारांकडून निकालाचे स्वागत

Subscribe

 

मुंबईः बैलगाडा शर्यतींसंदर्भात विधिमंडळानी केलेले कायदे वैध ठरवत बैलगाडा शर्यतींची मान्यता कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह, आनंददायी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने शेती संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेली बैलगाडा शर्यतीची परंपरा अधिक समृद्ध होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

बैलांची अधिक चांगली काळजी घेतली जाईल. बैल हा शेतकऱ्यांचा साथीदार, कुटुंबातील सदस्य समजला जातो. शेतकरी आणि बैलांचं हे नातं यापुढे अधिक वृद्धिंगत होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल बैलगाडा चालक, मालक शेतकरी, बैलगाडा शर्यतप्रेमी बांधवांचे अभिनंदन. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले त्या सर्वांसह यासाठी विशेष पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे अभिनंदन. बैलगाडा शर्यतीचे सर्व नियम पाळून, बैलांची योग्य काळजी घेत आपण ही परंपरा, संस्कृती जपूया, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा नक्कीच दिलासादायक निर्णय असून बळीराजाच्या कुटुंबशैलीचा अविभाज्य भाग असलेली सर्जा राजाची जोडी पुन्हा एकदा जोमाने उधळणार आहे याचा नक्कीच आनंद आहे, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविण्यात आली होती. त्यावेळी या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर आज अखेरीस सुनावणी करत बैलगाडा शर्यत सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -